पाथरी : तालुक्यात खरीपात सर्वाधिक पेरा कापूस लागवडीचा होत होता. मागील काही वर्षात या भागातील शेतकऱ्यांचा कल कापूस पिकाऐवजी सोयाबीन लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. यावर्षी कृषी विभागाच्या सल्याने शेतकऱ्यांनी घरगुती बियाणांचा वापर केला आहे. पर्यायाने बाजारात आता उपलब्ध झालेला सोयाबीनच्या बियाणांचा साठा पडून राहिला आहे. पाथरी तालुका हा उसाचे भांडार म्हणून ओळखला जातो. या भागातील मागील अनेक वर्षांपासून शेतकरी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करतात. ऊस पिकासोबतच कपाशीच्या पिकाचाही पेरा मोठ्या प्रमाणावर असे. ऊस गाळपासाठी शेतकऱ्यांना नाहक यातना सहन कराव्या लागत असल्याने उसाचे क्षेत्र झपाट्याने कमी होऊन कपाशीच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली. परंतु कपाशीच्या पिकाला बियाणे, खत, औषधी आणि त्यासाठी लागणारी मेहनत यावर मोठ्या प्रमाणावर खर्च होऊ लागला आणि त्यातच कापसाला भावही व्यवस्थित न मिळाल्याने खर्चही या पिकातून भागेनासा झाला. पर्यायाने मागील काही वर्षात सोयाबीनच्या पेऱ्याकडे मोठ्या प्रमाणावर शेतकरी वळला गेला आहे. खर्च कमी आणि उत्पादन जास्त मिळत असल्याने अल्पभूधारक शेतकरी तर कपाशीऐेवजी सोयाबीनचे पीक घेऊ लागला. गतवषी सोयाबीनच्या पिकाला उतारा चांगला आला तसेच बाजारामध्ये भावही चांगला मिळाला. निसर्गाच्या लहरीपणामुळे गतवर्षी शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. पर्यायाने या भागातील शेतकरी आता नगदी पिकाकडे वळला आहे. यावर्षी सोयाबीनच्या पेऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी घरगुती बियाणांचा वापर करावा यासाठी कृषी विभागाने सुरुवातीपासून शेतकऱ्यांचे मेळावे घेऊन मार्गदर्शन केले. घरगुती बियाणांसाठी शेतकऱ्यांचा ओढाही दिसून आला. यामुळे खरीप हंगामाच्या ऐन तोंडावर बाजारामध्ये उपलब्ध झालेल्या सोयाबीनच्या बियाणाला मागणी असल्याचे दिसून आले. यामुळे व्यापाऱ्याकडे आलेला सोयाबीनच्या बियाणांचा साठा सद्य स्थितीत पडून आहे. (वार्ताहर)१५ हजार हेक्टरपर्यंत वाढेल पेरापाथरी तालुक्यात सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ५ हजार १८० हेक्टर एवढे आहे. गतवर्षीच्या सोयाबीनच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन १३ हजार १०० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला. याहीवर्षी या पेऱ्यात वाढ होऊन १५ हजार हेक्टरपर्यंत सोयाबीनचा पेरा होईल, असा अंदाज तालुका कृषी अधिकारी बी.के. काकडे यांनी व्यक्त केला. उशिरा पावसामुळे पेऱ्यात वाढखरीप हंगामाच्या तोंडावर सुरूवातीला लवकर पाऊस झाला तर शेतकरी मूग आणि उडीद या पिकांचा पेरा करतात. परंतु मागील काही वर्षात वेळेवर पाऊस पडत नसल्याने शेतकरी मूग आणि उडीद ऐवजी सोयाबीनच्या पेऱ्याकडे मोठ्या प्रमाणावर वळले आहेत. पर्यायाने या भागात सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मागणीत ३० टक्के घटया भागातील शेतकरी सध्या संभ्रमावस्थेत असून वेळेवर पाऊस झाला तर सोयाबीनचा पेरा वाढणार आहे. परंतु या भागातील शेतकऱ्यांनी घरगुती सोयाबीन बियाणे उपलब्ध केल्याने बाजारातील बियाणांच्या मागणीवर परिणाम झाला आहे. यामुळे बाजारातील बियाणाच्या मागणीत ३० टक्के घट होणार असल्याची माहिती लक्ष्मी फर्टिलायझरचे मालक शिवाजी चिंचाणे यांच्या वतीने देण्यात आली आहे.
सोयाबीनचा पेरा वाढणार
By admin | Updated: June 13, 2014 00:31 IST