शेषराव वायाळ, परतूर अवकाळी पावसाने सोयाबीनची प्रत खराब झाल्याने यंदाच्या खरीप हंगामात ‘सोयाबीन’ बियाणांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होण्याची शक्यता आहे. दरम्यान कृषी विभागही याबाबत भीती व्यक्त करीत आहे. यावर्षी ऐन सोयाबीन काढणीच्या वेळीच अवकाळी पावसाने हजेरी लावली. गारा, वार्यासह हा पाऊस सतत पडत राहिल्याने काढणीस आलेले व काढून टाकलेले सोयाबीन पाण्यात भिजले. काही ठिकाणी तर काढून टाकलेले सोयाबीन सततच्या पावसाने अक्षरश: पाण्यावर तरंगत होते. यामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले. बरोबरच झालेल्या सोयाबीनची प्रतही खराब झाली. विविध कंपन्यांच्या बियाणे प्लॉटचीही अशीच अवस्था झाली. तालुक्यात शेतकर्यांकडे २ हजार ४६० क्विंटल बियाणे उपलब्ध आहेत. या उपलब्ध बियाणांचा दर्जा खालावल्यामुळे, उगवण शक्ती कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदरील बियाणावर बीज प्रकिया करून, उगवण शक्तीची तपासणी करूनच शेतकर्यांना बियाणे पेरणी करावी लागणार आहे. सोयाबीन पिकाला लागवडीपासून काढणी पर्यंत खर्च कमी लागतो. त्यामुळे इतर पिकांपेक्षा तालुक्यातील शेतकरी आता सोयाबीन पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. मागील वर्षी १२ ते १३ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. या वर्षी पुन्हा हे क्षेत्र वाढून १५ ते १६ हेक्टर पर्यंत जाण्याची शक्यता आहे. मात्र आता या वाढत्या क्षेत्राला बियाणे कोठून आणायचे असा प्रश्न शेतकर्यांपुढे पडला आहे. एकूणच बियाणांच्या अत्यल्प उत्पादनामुळे बियाणांचा काळा बाजार करणारेही पुढे सरसावणार आहेत. बियाणांचा होणारा तुटवडा व शेतकर्यांची वाढती मागणी याबाबतीत कृषी विभागही धास्तावला आहे. एकूणच यावर्षी सेयाबीन उत्पादक मोठ्या अडचणीत सापडला आहे. या संदर्भात तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे म्हणाले की, अवकाळी पावसाने सोयाबीनच्या बियाणांचा दर्जा खालावल्यामुळे उगवण शक्ती कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्यांनी आपल्याच बियाणांची खात्रीने पेरणी करावी असेही कांबळे यांनी सांगितले.
सोयाबीनचा तुटवडा भासणार
By admin | Updated: May 19, 2014 01:08 IST