सोशल मीडियाच्या वापराने सध्या प्रत्येक जण स्वयंभू वार्ताहर झाला. अभिव्यक्तीचा हुंकार सहजपणे तो व्यक्त करतो. त्याला कोणताही आडपडदा नाही, की कुणी सेन्सॉर नाही. तो आपल्या मनात सुरू असलेली घालमेल, भावभावनांची आंदोलने क्षणार्धात जगाच्या कॅन्व्हॉसवर उमटवू शकतो. त्याच्या मनात सुरू असलेल्या द्वंद्वाला क्षणार्धात प्रत्युत्तर व प्रतिसादही मिळतो. मग तो कधी सकारात्मक तर कधी नकारात्मकही असतो. या तंत्रज्ञानामुळे संवादात क्रांती झाली. संवादाने समाज जोडला जातो तसा तो सहज तोडण्याची व विध्वंस घडविण्याची मोठी शक्ती या माध्यमात असल्याचे आपण पाहतो आहे. लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा झालेला भलाबुरा वापर व त्याचे परिणाम सर्वांनी पाहिले. महापुरुषांच्या अवमानकारक पोस्टवरून गेल्या दोन आठवड्यांपासून देशात निर्माण झालेल्या अराजकसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लोकमतने जनसंवाद, तंत्रज्ञान, कायदा, सामाजिक उपक्रम, व्यापारी व मानसोपचारतज्ज्ञांसह पोलीस अधिकाऱ्यांना निमंत्रित करून ‘सोशल मीडिया आणि सामाजिक वितुष्ट’ या विषयावर बहुअंगाने घडवून आणलेली ही परिचर्चा. संकलन : शांतीलाल गायकवाड‘इंटरनेट हे शाप की वरदान’ हा वादविवादाचा विषय ठरतो आहे. पूर्वी महापुरुषांच्या पुतळ्यांची थेट विटंबना केली जायची. त्यावर पर्याय म्हणून आम्ही आमचे महापुरुष जाळी लावून कुलूपबंद केले. आता इंटरनेटच्या मृगजळाने वेढलेल्या जगात वाढलेल्या सायबर क्राईमला कसे कुलूपबंद करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नावर आयटीचे अभ्यासक आश्वस्त आहेत. नको असलेल्या समाजविघातक ठरू शकणाऱ्या बाबीवर सहज प्रतिबंध घालणे शक्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, तर माध्यम अभ्यासकांच्या मते या माध्यमावर आता तंत्रज्ञानाने बंधन घालणे अशक्य आहे. गुन्हेगारी ही वृत्ती असून ही वृत्ती घालविण्यासाठी समाजमनाचे प्रबोधन करावे लागणार आहे. मानसोपचारतज्ज्ञांना हा एक आजार वाटतो; परंतु कायद्याचे सातत्याने पुनर्विलोकन, कठोर अंमलबजावणी व शिक्षा होणे आवश्यक असल्याबद्दल सर्वांचेच एकमत होताना दिसते.लोकशिक्षणातूनच सामाजिक आजार घालवावा लागेलआधुनिक संवाद साधनांचा विकास झाला. या माध्यमांचा क्रांतिकारक परिणामही दिसून येत आहे. समाजाच्या चलनवलनात आमूलाग्र बदल झाले. संवादसुलभतेसह अभिव्यक्तीमध्ये सहजता आली. टीव्ही, रेडिओ, दैनिके आदी माध्यमातील गेटकीपरमुळे प्रत्येकाला हवी तशी अभिव्यक्ती सहज शक्य झाली नाही. सोशल मीडियाला गेटकीपर नाही. त्यामुळे प्रत्येक जण त्याला हवे ते व हवे तसे प्रकट होतो आहे. त्यामुळे या नव्या माध्यमाचा सदुपयोग होतो, तसा दुरुपयोगही होत आहे. नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यायला माणसांना काही अवधी हवा असतो. तसा या माध्यमांशीही तो विवेकाने जुळवून घेईल; परंतु सध्याच्या या माध्यमाच्या अविवेकी वापरामुळे समाजात हिंसक घटना घडत आहेत. समाजासमाजात द्वेष, विकृती पसरविली जात आहे. यावर बंधने घालण्यास २००५चा आयटी अॅक्ट प्रभावी नाही. सध्या तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत आहे. त्यामुळे तंत्रज्ञानविषयक कायद्याचे पुनर्विलोकन दरवर्षी झाले पाहिजे. सोशल माध्यमांना देशाच्या सीमेत बांधून ठेवता येत नाही किंवा एक देश त्यावर नियंत्रणही आणू शकत नाही. त्यामुळे आंतरदेशीय कायद्याची गरज निर्माण झाली आहे. माध्यमांचा वापर खूपच सोपा आहे. कुणालाही सहज खाते उघडता येते. त्यावर काही विशिष्ट बंधने घालायला हवीत. माध्यमांचा विवेकाने वापर करण्यासाठी प्रगल्भ समाज निर्माण झाला पाहिजे. हा एक सामाजिक आजार आहे. फक्त कायद्याने हटणार नाही. तंत्रज्ञानावर बंधने आणून नियंत्रित होणार नाही. त्यासाठी लोकशिक्षणातून जाणीवजागृती व माध्यमसाक्षरता वाढविणे आवश्यक आहे. माणसाने आता अंतर्मुख होणे आवश्यक आहे, कारण दिवसेंदिवस माणूस अधिक विघातक होत चालला आहे. प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे, विभागप्रमुख, जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.पोस्ट फॉरवर्ड करण्यापूर्वी पोलिसांना कळवासायबर क्राईमला मर्यादा नाहीत. त्याची अंगेही वेगवेगळी आहेत. मोबाईल व संगणकाच्या माध्यमातून जग अगदी तुमच्या समोर आले आहे. तुम्हाला काय हवंय आणि काय नाही, हा चॉईस व अधिकारही तुमचाच आहे. सध्या साध्या-साध्या पोस्टवरून समाजात वातावरण तंग होत आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. हे गुन्हे शोधून काढण्यास पोलिसांना प्रशिक्षण दिलेले आहे. यंत्रणा उपलब्ध आहे. त्यानुसार आम्ही गुन्ह्याचा शोध घेतो; परंतु कोणती पोस्ट कुणी टाकली, हे शोधून काढणे काही सोपे नसते. चौकशी करताना देश व इतर देशांच्या कायद्याच्या चौकटीचे पालन करावे लागते. माहिती मिळण्यात अडचणी येतात. बऱ्याचदा या पोस्ट प्रॉक्सी आयपीवरून टाकल्या जातात. त्यांना लाईक्सही मिळतात व शेअरही होतात; परंतु अशा तेढ निर्माण करणाऱ्या किंवा अश्लील पोस्ट नागरिकांनी पुढे फॉरवर्ड करू नये, त्याची माहिती पोलिसांना दिल्यास पोलीस वेळीच कारवाई करून पुढे होऊ घातलेला अनर्थ किंवा अनुचित प्रकार रोखू शकतात. आमच्याकडे येणारे गुन्हेही असेच असतात, बहुतांश वेळेस ते मेंटली डिसआॅर्डर व्यक्तीकडून केले जातात, तर कधी कंपनीतील कर्मचाऱ्याकडूनच डेटा चोरीचे प्रकार होतात. कोट्यवधीचे बक्षीस लागल्याचा ई-मेल येतो व अनेक माणसे सहज पैसेही भरतात. माणसाच्या या लोभी प्रवृत्तीचा गुन्हेगार सहज वापर करून सायबर गुन्हा करतात. शेवटी २००५ च्या कायद्यानुसार दहशतवादी कृत्ये व हॅकिंगसारखे गुन्हे वगळता इतर सर्व गुन्हे हे जामीनपात्र आहेत, ही आपल्या कायद्याची मर्यादा आहे. तरीही योग्य प्रकारे तपास होत आहे. गुन्ह्यात शिक्षा होण्याचे प्रमाण ६ वरून १८ टक्क्यांवर पोहोचले आहे. गौतम पातारे, पोलीस निरीक्षक, सायबर क्राईम सेल, पोलीस आयुक्तालय सायबर क्राईमच्या सर्वाधिक बळी महिला गुन्हा कोणताही असो सर्वाधिक बळी महिलाच ठरतात. सायबर क्राईममध्येही सर्वाधिक बळी महिलाच ठरल्या आहेत. कार्यालयातील सहकाऱ्यांतील मतभेद असो की पती-पत्नीची भांडणे. महिलांनाच लक्ष्य केले जाते. प्रत्येक महिलेला किमान एकदा तरी अशा घटनेचा सामना करावा लागला, असा धक्कादायक निष्क र्ष आम्ही केलेल्या एका पाहणीतून समोर आला होता. कॅमेरा, इंटरनेट, फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉटस्अॅप आदी सर्व सुविधा व तंत्रज्ञान मोबाईलमध्ये उपलब्ध आहे. याचा गैरवापर सहज होतो. बेसावध महिला, मुलींचे छायाचित्र काढून त्याचा गैरवापर केला जातो. त्याचप्रमाणे लहान मुलांचेही शोषण या माध्यमातून होत आहे. असे अनेक घातक प्रकार वाढले आहेत. या माध्यमाचा गैरवापर होत असून त्यासाठी या माध्यमाचा योग्य वापर कसा करावा, यासंदर्भात जाणीव-जागृती होणे आवश्यक आहे. भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे सध्या ‘सेफ इंटरनेट युज’ हा उपक्रम चालविला जात आहे. त्यातून संगणकाच्या योग्य वापराबाबत आम्ही मुले, मुलींना प्रशिक्षण देत आहोत. शेवटी ही गुन्हेगारी रोखण्यासाठी लोकशिक्षण आवश्यक आहे. -रेणुका कड, कार्यक्रम समन्वयक, कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टकायदेशीर कारवाईसह उपचारही आवश्यकमाणसाच्या आदिम प्रवृत्तीपासून गुन्हेगारी आढळते. गुन्हेगारीची पद्धती, मोड सतत बदलत गेला; परंतु माणसाची गुन्हेगारीची मूळ प्रवृत्ती मात्र आहे तशीच आहे. जशी आधुनिकता वाढली, तंत्रज्ञान आले, त्याच्या सोबत तशी अत्याधुनिक गुन्हेगारी आली. मानसशास्त्रीयदृष्ट्या गुन्हेगारीचे आम्ही दोन प्रकार करतो. पहिला प्रकार म्हणजे हा एक प्रकारचा आजारच आहे. त्याला आम्ही पर्सनॅलिटी डिसआॅर्डर म्हणतो. दुसरा अॅन्टीसोशियल किंवा विघ्नसंतोषीपणा म्हणता येईल. पहिल्या प्रकारातील माणसे अशी कृत्ये सहजगत्या करीत असतात व त्यांना त्याची चटकच लागलेली असते. या दुसऱ्या प्रवृत्तीची माणसेही समाजकंटकच असतात. त्यांचा वापर करून कुणीही त्यांच्याकडून समाजविघातक कृत्ये करून घेऊ शकतो. त्यामागे राजकीय, सामाजिक, आर्थिक कोणतीही कारणे असू शकतात. या मनोवृत्तीला आळा घालता येतो. मुळात ही प्रवृत्ती एक आजारच आहे, हे आपण मान्य करून त्यावर औषधोपचार केले पाहिजेत. औषधोपचाराने या प्रवृत्तीला आळा घालता येऊ शकतो. नियंत्रण मिळविता येऊ शकते. कायद्याची योग्य व वेळेत अंमलबजावणी करून कायद्याची जरब समाजात निर्माण करता आली पाहिजे; परंतु कायदेशीर जरब निर्माण करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे. प्रगल्भ व सुसंस्कृत समाजाची निर्मिती झाली तर तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेण्याऐवजी त्याचा वापर विकासासाठी समाजाकडून केला जाऊ शकतो. गुन्हेगारी कमी होऊ शकते. -डॉ. आनंद काळे, मानसोपचारतज्ज्ञव्यापारी होरपळतोयखटले वेळेत चालत नाहीत व गुन्हेगारांना शिक्षाही होत नाही. त्यामुळे गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढते. शिवाय दाखल होणारे गुन्हे व होणाऱ्या शिक्षा यांचे प्रमाण खूपच व्यस्त आहे. समाजकंटकांचे मनोधैर्य वाढत आहे. क्षुल्लक घटनांवरून समाजात वितुष्ट वाढविले जात आहे. दररोज कुणी तरी व्यक्ती उठते व दुकाने बंद करते. या प्रकरणात व्यापारी होरपळतो आहे. दगडफेकीवरून होणारे बंद व्यापारी टाळू शकतो. यासंदर्भात आम्ही व्यापारी महासंघ, संगणक विक्रेते या सर्वांशी चर्चा केली आहे. -सतीश जोशी, संगणक विक्रेते (सेल अँड सर्व्हिस)अमर्याद असले तरी मर्यादा घालणे शक्यसोशल माध्यमाच्या माहितीचा व बदलाचा वेगही प्रचंड आहे. या विषयाची व्याप्ती मोठी आहे. सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व आर्थिक आदी सर्वच क्षेत्रांशी सोशल माध्यमांचा संबंध येतो. त्यामुळे या सर्वच क्षेत्रांतील प्रश्न या माध्यमामुळे निर्माण झाले आहेत. एक मात्र निश्चित, हे तंत्रज्ञान अमर्याद असले तरी त्याच्यावर मर्यादा नक्कीच घालता येते. सॉफ्टवेअर, हार्डवेअर, डिव्हाईस, उत्पादक कंपन्या व वितरक कंपन्या आदी विविध टप्प्यांवर या माध्यमासाठी आपल्याला गेटकीपर बसविता येतील. महापुरुषांचे फोटो, त्यांच्या संदर्भातील माहिती, कॅरिकेचर किंवा अन्य कोणत्याही बाबीची परिमिती, स्टँडर्ड ठरविणे शक्य आहे. विशिष्ट फॉर्मेटमध्ये या बाबी आल्या नाहीत तर त्या रिजेक्ट होऊ शकतात, अशी तरतूद करणे अवघड नाही. अनेक संस्थांनी पोर्नसाईटसह त्यांना नको असलेल्या साईट ब्लॉक केल्या आहेतच. याशिवाय मोबाईल किंवा संगणकात कुणी युजर सॉफ्टवेअर डाऊनलोड करीत असेल तर त्याला त्या सॉफ्टवेअरच्या गैरवापराबद्दल होणाऱ्या शिक्षेची माहिती देणारे स्क्रोल, ब्लिकर्स टाकले जावेत, कायद्याची अंमलबजावणी योग्य व्हावी, वितरक, उत्पादकावर काही बंधने घालावीत, कायद्यात झपाट्याने बदल करून घेणे सध्या खूपच आवश्यक झाले आहे. प्रा. डॉ. के.व्ही. काळे, विभागप्रमुख, संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभाग, डॉ. बाआंमवि
सोशल मीडियावरील विकृती हा आजार!
By admin | Updated: June 11, 2014 00:53 IST