अजिंठा : सिल्लोड तालुक्यातील अजिंठा परिसरात जळगावच्या वाळूमाफियांनी प्रशासनाशी सूत जमवून अवैधरीत्या वाळू तस्करी सुरू केली आहे. १०० वाहनांद्वारे एका रॉयल्टीवर दिवस-रात्र तीन ट्रिपा मारून वाळूमाफियांनी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला आहे. वाळूमाफिया प्रशासनाशी सूत जमवून ग्राहकांना अव्वाच्या सव्वा दराने रेती विक्री करीत आहेत.अजिंठा परिसरात जास्त दराने रेती विक्री होत असल्याने जळगावच्या १०-१२ रेती माफियांनी अजिंठ्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. दिवसा व रात्री एक वाहन तीन ट्रिपा मारत असून, जवळपास टिप्पर व ट्रक मिळून १०० वाहने रस्त्यावरून जाताना दिसत आहेत. एका टिप्परमध्ये केवळ दोन ब्रास वाळू वाहतुकीचा परवाना असतो; पण हे माफिया एका टिप्परमध्ये चार ते पाच ब्रास वाळू वाहतूक करतात. एका दिवसात केवळ एकच रॉयल्टी भरून तीन ट्रिपा मारल्या जातात.ट्रॅक्टर व टिप्परद्वारे होणारी वाळू तस्करी ताडपत्री लावलेल्या ट्रकमधूनसुद्धा होत आहे. ट्रकमध्ये जास्तीत जास्त १६ टन वाहतूक करता येते; पण या ट्रकमध्ये ३२ ते ५४ टन वाळू वाहतूक होते.
जळगावच्या माफियांकडून अजिंठा भागात वाळू तस्करी
By admin | Updated: June 15, 2014 00:54 IST