औरंगाबाद : रोटरी एलाईट क्लबचे स्नेहमिलन नुकतेच उत्साहात पार पडले. क्लबचे अध्यक्ष अशोक मतसागर यांनी क्लबतर्फे राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. सचिव उत्तम शिरसाट यांनी स्वागत केले.
माजी प्रांतपाल सुहास वैद्य यांनी रोटरीविषयी माहिती दिली. ॲड. सुधीर कुलकर्णी आणि दीपाली कुलकर्णी या क्लबमध्ये नव्याने सहभागी झाल्याने सदस्यांचे स्वागत करण्यात आले. सुनीता वैद्य, विवेक कानडे, हसमुख सोमय्या, अभय स्मार्त, उज्वल बोरुले, प्रदीप देशमुख, सविता मतसागर यांच्यासह क्लबच्या सर्वच सदस्यांची यावेळी उपस्थिती होती.
-----------
कमी दाबाने पाणी
औरंगाबाद : मुकूंदवाडी, जयभवानी नगर परिसरात कमी दाबाने पाणी आल्याने नागरिक त्रस्त झाले. लग्नसराईच्या दिवसांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याने परिसरातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
---------
खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त
औरंगाबाद : संत एकनाथ रंग मंदिरासमोरील मार्गावरील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहे. हा रस्ता नेहमीच वर्दळीचा असल्याने खड्डे चुकवित मार्गक्रमण करणे नागरिकांना कठीण होत आहे. यामुळे सकाळी आणि सायंकाळी अनेकदा वाहतूक कोंडीही सहन करावी लागत आहे.
-----------
दिव्यांग दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन
औरंगाबाद : विहंग विशेष मुलांच्या शाळेतर्फे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये व्याख्याते मुलांना आणि त्यांच्या पालकांना ऑनलाईन मार्गदर्शन करतील. दि. ३ रोजी माधुरी देशपांडे यांचे व्याख्यान झाले. दि. ४ रोजी ज्योती इरावले शासकीय योजनांविषयी तर दि. ५ रोजी डॉ. रजनी पटवारी या अमेरिका येथून विशेष मुलांना सांभाळण्याच्या खास पद्धती याविषयी संवाद साधतील, असे शाळेच्या संचालिका आदिती शार्दूल यांनी सांगितले.
-----
सिग्नल बंद असल्याने अपघाताची भीती
औरंगाबाद : काल्डा कॉर्नर परिसरातील वीर सावरकर चौकातील सिग्नल बंद असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. सर्वच बाजूंनी गाड्या भरधाव येत असल्यामुळे अनेकदा अपघातजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. येथील सिग्नल नियमित सुरू ठेवावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.