लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बांधकाम कामगारांना अवजारे खरेदी करण्यासाठी अर्थसाहाय्य योजना सरकारने जाहीर केली आहे. मात्र, कुटुंबातील एकाच मजुराला लाभ घेता येणार असून,३ वर्षांत इतर सदस्यांनी लाभ घेतल्यास ती रक्कम परत घेऊन कारवाईस पात्र असल्याचे हमीपत्र मजुरांना द्यावे लागणार आहे.या अनुदानास पात्र ठरण्यासाठी मजुरांना नोंदणीकृत कामगार असल्याची प्रथमत: नोंदणी करावी लागते. आधार कार्ड, मतदान कार्ड, वीजबिल देयके, शिधापत्रिका, बँक पासबुक अशा विविध कागदपत्रांची आवश्यकता त्यासाठी आहे. शासनाच्या नोंदणीकृत संस्थेचा सभासद असलेल्या महिला व मजूर यास पात्र आहेत; परंतु ५ हजारांचे अनुदान हे त्या मजुराला एकदाच देण्यात येईल. त्यासाठी मजूर कुटुंबातील लाभार्थी एकच असावा. त्याने किंवा त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी ३ वर्षांत अर्थसाहाय्य घेतले असल्यास तो अपात्र होईल. तसेच जर त्याने अनुदान घेतले असेल तर ते परत द्यावे लागेल अन्यथा त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे हमीपत्र देखील त्याला स्वत:च भरून द्यावे लागणार आहे.बँकेचा खाते क्रमांक, आयएफसी कोड, आधार कार्ड, तुम्ही वर्षभर काम केल्याचे ठिकाण, परवाना नूतनीकरणासह अर्ज भरून द्यावा लागतो. त्यासाठी बांधकाम मजूर कामगार व महिला कामगार आयुक्त कार्यालयातील खिडकीत उभा राहतो आहे. कागदपत्रातील त्रुटी व त्याची पूर्तता करताना या मजुराचा पूर्ण दिवस वाया जात आहे.अद्याप कुणालाही वाटप नाही...महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने अनुदानासाठी ५ हजारांची नवीन योजना नुकतीच कार्यान्वित झाली आहे.त्यासाठी नोंदणी करणाºयांची संख्या वाढत असली तरी अद्याप कुणालाही वाटप करण्यात आलेले नाही. त्यातील जाचक अटींची पूर्तता करताना मजुरांची फरपट सुरू आहे. कार्यालयाबाहेर अनेकांनी खुर्च्या टाकून अर्ज भरून देण्याचे दुकान मांडल्याचे चित्र आहे. त्यामुळे खरे लाभार्थी कोण असा सवालदेखील उपस्थित होत आहे.
अवजारांसाठी कुटुंबातील एकालाच अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:26 IST