लातूर : लातूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत असतानाही अद्याप प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या नाहीत़ त्यामुळे नागरिकांची होरपळ सुरू आहे़ याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी गांभीर्याने पाहत नसल्याने पाण्याचा अक्षरश: खेळ झाला आहे़ सर्वसामान्य नागरिकांना सांडपाणीही विकत घेण्याची वेळ आली आहे़ हेच चित्र ग्रामीण भागातही दिसून येत आहे़ दुष्काळात पाणी विकत घेऊन प्यायची वेळ आली असल्याने शासनाकडून कधी उपाययोजना होणार याकडे शहरवासियांबरोबरच संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे़ दरम्यान, पाण्यासाठी नागपुरात विधान भवनासमोर महापौरांचे धरणे आंदोलन सुरू झाले आहे.लातूर शहराला गेल्या तीन वर्षांपासून पाणीटंचाईचे चटके सुरू आहेत़ यावर्षी तीव्रता अधिक असून फेब्रुवारीनंतर शहरावासियांचे हाल होणार आहेत़ मांजरा प्रकल्पात असलेल्या पाण्यावर आणखी दोन ते अडीच महिने लातूरकरांची तहान भागणार आहे, त्यानंतर मात्र काय उपाययोजना असतील यावर अद्यापही प्रशासनाने ठोस निर्णय घेतलेला नाही़ उजनीच्या धरणातून लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी आरक्षित करण्यात यावे़ उजनी ते लातूर शहरापर्यंत स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात यावी यासाठी लागणारा ६८८ कोटी रूपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे़ त्याचबरोबर शासनाने २०० फुटांपेक्षा अधिक खोल विंधन विहीर घेण्यास बंदी घातली असल्याने विंधन विहिरींचाही उपयोग होत नाही़ त्यामुळे विंधन विहिरीचा नियम शिथिल करून ४५० फुट खोलीपर्यंत विंधन विहिर घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे़ नागपूरच्या विधान भवनसमोर महापौरांसह पदाधिकाऱ्यांनीही धरणे आंदोलनात सहभाग नोंदविला आहे़ यात उपमहापौर कैलास कांबळे, स्थायी समितीचे सभापती पप्पू देशमुख, गटनेते नरेंद्र अग्रवाल, प्रभाग समितीच्या सभापती सपना किसवे, श्रीदेवी औसे, अॅड़ समद पटेल, प्रभाग समितीचे माजी सभापती प्रा़ राजकुमार जाधव, रूपाली साळुंके, केशरबाई महापुरे, उषा कांबळे आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश आहे़ (प्रतिनिधी)
टंचाईच्या उपाययोजना रखडल्या
By admin | Updated: December 14, 2015 23:56 IST