उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन : शिवजल क्रांती उपक्रमाचे मॉडेल राज्यासाठी आदर्शवतपरंडा : शिवसेना नेहमीच जनतेसोबत आहे. विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यामध्येही शिवसैनिकांनी मोठा पुढाकार घेतला असून, स्व. बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती मॉडेल मराठवाडाच नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी आदर्शवत असून, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याची क्षमता त्यामध्ये असल्याचे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. प्रा तानाजी सावंत यांनी नदी, नाले खोलीकरण व रुंदीकरणाचे केलेले काम कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले.सावंत प्रतिष्ठानने वतीने परंडा, भूम, वाशी तालुक्यातील ७० ठिकाणी शिवजल क्रांती योजनेंतर्गत नदी, नाल्यांच्या खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात आले आहे. भांडगाव येथे सदर कामाच्या लोकार्पण सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम, पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार चंद्रकांत खैरे, खासदार रविंद्र गायकवाड, भैरवनाथ शुगरचे व्हा. चेअरमन प्रा. शिवाजी सावंत, प्रा. तानाजी सावंत, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, ओम राजेनिंबाळकर, जि.प. सदस्य धनंजय सावंत आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. संपूर्ण मराठवाडा दुष्काळाने होरपळून निघत आहे. याच्या झळा उस्मानाबाद जिल्ह्याला अधिक सोसाव्या लागत असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही अनेक ठिकाणी गंभीर झाला आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेतर्फे राबविण्यात येत असलेला शिवजल क्रांती उपक्रम दुष्काळी भागाला दिलासा देणारा ठरणारा असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शिवसेना अग्रभागी आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून, शिवसेनेच्या माध्यमातून गरीब, कष्टकरी, शेतकरी कुटुंबातील सुमारे ८०० मुलींचे कन्यादान करण्यात आले असल्याचे ते म्हणाले. परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात आज दुष्काळी परिस्थितीमुळे अश्रु आहेत. मात्र शिवजल क्रांती योजनेमुळे या नदी, नाल्यात पावसाचे पाणी थांबेल तेव्हा तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील. ते आनंदाश्रू पाहण्यासाठी मी पुन्हा परंड्याच्या दौऱ्यावर येणार असल्याचा शब्दही ठाकरे यांनी यावेळी उपस्थितांना दिला. प्रारंभी प्रा. तानाजी सावंत यांनी प्रास्ताविक केले. शिवजल क्रांती योजनेच्या कामामुळे येणाऱ्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्यास ४ टीएमसी पाणी नदी,नाल्यात थांबेल. तर १२ टीएमसी पाणी भूगर्भात जिरेल, असे सांगत येत्या १० मे पासून सीना-कोळेगाव धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेणार असून, गाळ भरुन देण्याचा खर्च सावंत प्रतिष्ठान करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरसाठी डिझेलची सोय शासनाने करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावर उद्धव ठाकरे यांनी सावंत यांना डिझेलसोबत सिमेंट कालव्यासाठीही शासनाच्या माध्यमातून मदत उपलब्ध करुन द्यावी, अशी सूचना पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांना केली. या कार्यक्रमानंतर ठाकरे उस्मानाबादकडे रवाना झाले. दरम्यान, सावंत यांच्या बार्शी येथील भगवंत शिक्षण संस्थेसही ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे, शिवसेनेचे जि.प. गटनेते दत्ता साळुंके, तालुकाप्रमुख गौतम लटके, भूम तालुकाप्रमुख अनिल शेंडगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप शाळू, आण्णासाहेब जाधव यांच्यासह शंकर इतापे, गजेंद्र सूर्यवंशी, महादेव अंधारे, राजाभाऊ अंधारे, डॉ. प्रशांत मांजरे आदी उपस्थित होते.सावंत यांच्या कामाचे केले कौतुकशिवजल क्रांती योजनेंतर्गत सावंत प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेले नदी, नाले खोलीकरण व रुंदीकरणाचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी सावंत बंधूंचे जाहीर कौतुक केले. सावंत यांच्या पाठीवर थाप मारण्यासाठीच इथपर्यंत आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिवसेना दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी
By admin | Updated: May 5, 2016 00:34 IST