यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील कार्ला गावाजवळील एका बंजारा तांड्यात गोपीबाई जाधव यांच्या पोटी जन्मलेला मुलगा म्हणजे रमेश जाधव. त्यांचे वडील आत्माराम जाधव हे शेतकरी होते; पण कोरडवाहू शेती असल्याने ते अनेकदा सालगडी म्हणून काम करीत. जाधव कुटुंबीयांच्या अनेक पिढ्यांना शिक्षणाचा स्पर्शही झाला नव्हता; मात्र काका, वडील हे वारकरी संप्रदायात वाढलेले. घरात धार्मिक वातावरणामुळे सामाजिक बांधीलकीचा गुण बालवयापासूनच रमेश यांच्या मनात खोलवर रूजला होता. पुसद हे गाव हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक व माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा मतदार संघ होता. त्यांना गावात ‘नाईक वकील’ असे संबोधले जात होते. आपल्याला जीवनात काय बनायचे तर ‘ नाईक वकील’ सारखे असे त्या वेळीस त्यांनी मनात ठरविले होते. शिक्षणाच्या ओढीने त्यांना जिंतूर तालुक्यातील हट्टा गावात आणले. येथील देव महाराज विद्यालयात त्यांनी शिक्षणाचा श्री गणेशा केला. १० वीमध्ये शून्य टक्के निकाल ही या शाळेची परंपरा त्यांनी मोडीत काढली व १९८६ मध्ये त्यांनी दहावी पास होत शाळेला बंद पडण्यापासून वाचविले. दहावी पास झाल्याने त्यांचा आत्मविश्वास बळावला होता. यामुळे पुसद येथील फुलसिंग नाईक जुनिअर कॉलेजमध्ये त्यांनी १२ वी पास करीत पदवीच्या शिक्षणासाठी १९८८ मध्ये औरंगाबाद गाठले. तेव्हा केळीबाजारातील पॅरेडाईज लॉजमध्ये नातेवाइकांच्या रुममध्ये राहून त्यांनी वसंतराव नाईक महाविद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. घरुन मिळणारे धान्य व सरकारी स्कॉलरशीपच्या आधारे त्यांनी ध्येयपूर्तीकडे वाटचाल सुरू ठेवली. त्यांनी दोन ड्रेसवर संपूर्ण वर्ष काढले; पण आर्थिक मदतीसाठी कोणासमोर हात पसरविला नाही. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना एनएसएसद्वारे सामाजिक चळवळ कळाली, विद्यार्थी प्रतिनिधी होत नेतृत्वगुणाला याच महाविद्यालयात त्यांना चालना मिळाली.
त्यानंतर कमवा व शिका, या योजनेत सहभागी होऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्यांनी एम.ए.चे शिक्षण पूर्ण केले. याच काळात माजी कुलगुरु नागनाथ कोत्तापल्ले, अरविंद कुरुंदकर, गंगाधर पानतावणे, एस. एस. भोसले सरांच्या मार्गदर्शनाने त्यांची बौद्धिकता उजाळून निघाली. त्या काळात गुरुवर्याकडून मिळालेली ज्ञानाच्या शिदोरीने आजतागायत कधीच कमी पडू दिले नाही. एम.ए.ची पदवी तेही त्याकाळात बी प्लसमध्ये प्राप्त केल्याने महाविद्यालयाकडून नोकरीच्या अनेक ऑफर आल्या होत्या; मात्र संयम राखत त्यांनी फोस्टर डेव्हलपमेंट कॉलेजातून बीएड पूर्ण केले. त्यांनी १९९४-१९९५ या वर्षात मौलाना आझाद कॉलेजमध्ये अर्धवेळ प्राध्यापकाची नोकरीने अध्यापन करण्यास प्रारंभ केला. खुद्द संस्थापक, माजी मंत्री रफीक झकारीया यांनी जाधव यांची मुलाखत घेतली होती हे विशेष.