वडवणी: तालुक्यातील चिंचोटी येथे सकाळी ९ वा. अचानक शॉर्टसर्किट झाल्याने भगवान कडाजी गोंडे यांच्या शेतातील जोमात आलेला २ एकर ऊस जळून खाक झाला. झालेल्या नुकसानीचा पंचनामा तहसीलच्या कर्मचार्यांनी केला आहे. या आगीत ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. एवढी मोठी आग लागूनही महावितरणचा एकही कर्मचारी, अधिकारी याकडे फिरकला नसल्याने शेतकर्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वडवणीपासून ३ कि.मी. अंतरावर चिंचोटी हे गाव आहे. येथील शेतकरी भगवान गोंडे यांच्या शेतात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने शेतातील उभ्या उसाला आग लागली. आग विझविण्यासाठी परिसरातील नागरिक धावपळ करीत होते. आग आटोक्यात आणेपर्यंत अंदाजे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले होते. तलाठी कुपेकर, मंडळ अधिकारी भडके यांनी पंचनामा करुन तहसीलदारांकडे अहवाल पाठविला आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. (वार्ताहर) महावितरणचा गलथान कारभार. अभियंत्यांनी सांगितले की, सुटीचा दिवस असल्याने लाईनमन नाही. मुळात चिंचोटी या गावाला हक्काचा लाईनमन नाही. आग बुधवारी पंचनामे गुरुवारी करू म्हणून अभियंत्यांनी घेतला काढता पाय.
चिंचोटी येथे शॉर्टसर्किटने दोन एकर ऊस जळून खाक
By admin | Updated: May 15, 2014 00:04 IST