पुरुषोत्तम करवा , माजलगावमहाराष्ट्र शासनाने तलाठ्याचा ताण कमी करुन सर्व शेतकऱ्यांना गावागावात सातबारा मिळावा, यासाठी २०१०-११ साली संगणकीकृत सातबारा देण्यास सुरुवात केली. चार वर्षांपासून हे मिळत असले तरी यामध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. याची अद्यापही दुरुस्ती झालेली नाही. पूर्वीचा पीक पेराच अद्यापपर्यंत नोंद असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.करोडो रुपये खर्च करुन शेतकऱ्यांना कुठेही सातबारा मिळावे, यासाठी संगणकीकृत सुविधा सुरू केली. माजलगाव तहसीलने २०११ सालीच हस्तलिखित सातबाराचे संगणकीय सातबाराचे काम पूर्ण केले होते. या संगणकीकृत सातबारामध्ये मोठ्या प्रमाणावर चुका असून, या झालेल्या चुका अद्यापही तहसील कार्यालयाने काढलेल्या नाहीत. या सातबाऱ्यामध्ये अनेकांचे क्षेत्र कमी तर अनेकांचे जास्त झाले आहे. २०११ सालापासून ज्या शेतकऱ्यांनी जमीन विकत घेतली त्यांचे चार वर्षांपासून संगणकीकृत सातबाऱ्याला फेर न ओढल्याने सातबाऱ्याला नावच लागलेले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या जमिनीचा सातबारा काढून त्यावर कर्ज उचलण्याच्या अनेक घटना या तहसील कार्यालयांर्तगत घडलेल्या आहेत. तर अनेकांनी अनेक बँकांकडून कर्ज घेतले आहे. मात्र संगणकीकृत सातबारावर अद्याप बोजा चढविलेला नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा-पुन्हा कर्ज उचलल्याचे आढळून आले आहे. माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील एकाही शेतकऱ्याच्या सातबारावर पीक पेऱ्याची नोंद नसल्याचे आढळून आले आहे. संगणकीकृत सातबाराला पीक पेरा ओढा नसल्याने गारपिटीत अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पीक एक होते व सातबाऱ्याला दुसरेच, यामुळे अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यात अडचणी आल्या. सध्या माजलगाव बाजार समितीअंतर्गत शासनाची कापसाची सीसीआयमार्फत खरेदी चालू असल्याने त्याठिकाणी शेतकऱ्यांना पीक पेऱ्याची नोंद नसल्याने शासनाच्या कापूस खरेदी केंद्रावर विविध अडचणी येत आहेत. याबाबत तहसीलदार डॉ. अरुण जराट म्हणाले, जेंव्हापासून सातबारा संगणकीकृत करण्यात आला तेंव्हापासून आॅनलाईन अपडेट बंदच आहे. याचे काम तात्काळ करू.
सातबाऱ्याला पीक पेऱ्याची नोंदच नाही
By admin | Updated: December 22, 2014 23:33 IST