औरंगाबाद : सातारा परिसरातील तलाठी कार्यालयास टाळे असल्याने अधिकारी भेटत नसल्यामुळे नागरिकांना फेऱ्या माराव्या लागत आहेत. संगणकीय सातबारे सेतूमधून घ्यावेत, अशा सूचना दिल्या असल्या तरी परिसरातील सेतू सुविधा महा ई-सेवा केंद्र बंद असून नागरिकांची मात्र धावपळ होत आहे. सातारा परिसरात एन-४७ बीच्या सर्व्हेपासून नागरिक आपल्या मालमत्तेविषयी सतर्क झाले असून, साडेदहा हजार मालमत्तांची रीतसर नोंदणी तलाठी सज्जाच्या अधिकाराखाली ग्रामपंचायतीला सुपूर्द करण्यात आली. त्यावेळी ग्रामपंचायत व महसूल विभागाला मोठा महसूलही मिळाला होता. सध्याच्या स्थितीत मात्र कार्यालयाचा महसूल बुडत असल्याची तक्रार सातारा परिसरातील असंख्य नागरिकांतून होत आहे. कारण तलाठी कार्यालयात अधिकारी मिळत नसल्याने महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागते. सध्या शाळा, महाविद्यालये सुरू होत असून, शालेय कामासाठी व बँक तसेच प्रॉपर्टीच्या कामासाठी कागदपत्रांसाठी नागरिक व पालकांची पायपीट वाढली आहे.मुख्य सेतू कार्यालयातील गर्दी नियंत्रणासाठी व नागरिकांना कागदपत्रे आपल्या परिसरात सहजपणे मिळावीत यासाठी हे सेतू सुविधा केंद्र विविध भागात सुरू करण्यात आले होते. तेथे रंगविलेले बोर्डही असून, सातारा परिसरातील महा ई-सेवा केंद्रात तर कांदे-बटाटे विक्रीचे दुकान सुरू आहे. तलाठी कार्यालयात अधिकारी उपलब्ध होत नसल्याने नवीन फेरफार व सातबारा उतारा घेण्यासाठी सातारा परिसरातील नागरिकांची धावपळ होत आहे. नागरिकांना सततच्या होणाऱ्या फेऱ्या टाळण्यासाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांना कार्यालयात वेळेवर उपस्थित राहावे; अन्यथा वरिष्ठांकडे दाद मागावी लागेल, असे काँग्रेसचे माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल काळे म्हणाले, तर राहुल शिरसाट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नागरिकांच्या अनेक तक्रारी आल्या असून, लवकरच आम्ही अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत. सेतू सुविधा केंद्र हलविल्यामुळे साताऱ्यातील नागरिकांना शहरात यावे लागते, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव जमील पटेल म्हणाले.
सेतू कार्यालय बंद, तलाठीही गैरहजर
By admin | Updated: June 12, 2014 01:34 IST