औरंगाबाद : शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी राज्य शासनाने १५२ कोटींचा निधी दिला. पोलीस मेस ते कटकट गेट रस्त्याचे काम याच योजनेतून सुरू करण्यात आले. ६ कोटी ५० लाख रुपये खर्च करून करण्यात येणाऱ्या कामात मागील आठ दिवसांपासून अडथळा निर्माण करण्यात आला आहे. ८१० मीटर काम झाल्यानंतर थांबविण्यात आल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
कटकट गेट ते पोलीस मेसपर्यंत शहर विकास आराखड्यानुसार १०० फूट रुंद रस्ता आहे. रस्ते विकास महामंडळामार्फत काम सुरू करण्यात आले. आणि पोलीस मेस ते कटकट गेटपर्यंत डाव्या बाजूला ८१० मीटर काम करण्यात आले. कटकट गेटपासून हाकेच्या अंतरावर काही मंडळींनी जमिनीचा वाद उकरून काढत काम थांबविले. महापालिकेच्या नगररचना विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पहिल्या दिवशी रस्त्यांची मोजणी केली. १०० रस्त्यावर नियोजित ठिकाणीच काम सुरू असल्याचा निर्वाळा दिला. त्यानंतरही काही नागरिकांनी काम सुरू होऊ दिले नाही. विशेष बाब म्हणजे ज्या ठिकाणी जागेच्या मालकीचा वाद उपस्थित झाला आहे तेथे महापालिकेने काही वर्षांपूर्वीच भूसंपादनासाठी टीडीआरही दिलेला आहे. त्यामुळे या भागात भूसंपादनाचा कोणताही विषय शिल्लक नसल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. रस्त्याचे काम मागील आठ ते दहा दिवसांपासून बंद असल्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
जाफर गेट रस्त्यावरही प्रचंड अतिक्रमणे
१५२ कोटी रुपयांच्या शासन निधीतून लक्ष्मण चावडी ते जाफर गेटपर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. या रस्त्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. त्यामुळे कामास विलंब होत आहे.
किलेअर्क येथील अतिक्रमणे जशास तशी
किलेअर्क येथील अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिकेने मागील महिन्यात मालमत्ताधारकांना नोटीस बजावल्या. मात्र, महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने कोणतीही कारवाई केली नाही. सिटी चाैक ते किलेअर्क पुलापर्यंत काम पूर्ण झाले आहे.