घाटनांद्रा : घाटनांद्रा ते पाचोरादरम्यान असलेल्या घाटनांद्रा घाटातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता जागोजागी खचल्याने मोठमोठे भगदाड पडल्याने हा घाट मृत्यूचा सापळा बनला आहे. यासंदर्भात नागरिकांनी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दुरुस्ती करण्याची मागणी केली. तरी देखील विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मोठा अपघात घडल्यास याला जबाबदार कोणाला ठरवायचे, असा प्रश्न प्रवाशांकडून केला जात आहे.
मराठवाड्यातून खान्देश भागाला जोडणारा रस्ता म्हणून राज्य महामार्ग क्रमांक ४८ ची ओळख आहे. या मार्गावर नेहमी मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते, तर रात्रीच्या वेळी अवजड वाहने मोठ्या प्रमाणात धावतात. दरम्यान, घाटनांद्रा घाटात जागोजागी रस्त्याच्या कडेला भगदाड पडले आहेत. घाटनांद्रा ग्रामपंचायतीने जानेवारी २०२१ मध्ये जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांना निवेदनाद्वारे ही बाब लक्षात आणून दिली. परंतु, प्रशासनाने या निवेदनाला केराची टोपली दाखविली आहे.
-----
संरक्षण कठडे नसल्याने भगदाड
घाटनांद्रा घाटातील सर्व वळणाच्या रस्त्यांना संरक्षण कठडे बसविण्यात आलेले नाहीत. ज्या ठिकाणी कठडे आहेत, अशा ठिकाणी भगदाड पडल्याने वाहनाचा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. एकूण नऊ किलोमीटर घाटाच्या रस्त्याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. या मार्गावरून नियमित प्रवास करणारे रावसाहेब शिंदे, लक्ष्मीकांत साळवे, सुभाष पाटील, जितेंद्र गायकवाड, रितेश महाले, संतोष पाटील यांनी रस्ता दुरुस्तीची मागणी केली.
---
170721\img-20210714-wa0043.jpg
घाटनांद्रा घाटातील रस्त्यावर पडलेले भगदाड