औरंगाबाद : मुकुंदवाडी परिसरातील प्रकाशनगर येथील रहिवासी रिक्षाचालकाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना रविवारी सकाळी घडली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.संजय आसाराम बकाल (२७, रा. प्रकाशनगर) असे आत्महत्या केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या संजय यांचे प्रकाशनगरमध्ये चार खोल्यांचे पत्र्याचे घर आहे. रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्याने आपल्या बेडरूमच्या छताच्या लाकडी बल्लीला गळफास घेतला.बराच वेळ झाला तरी संजय बाहेर न आल्याने नातेवाईकांनी त्याला हाका मारल्या. मात्र, त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी शेवटी दरवाजा तोडला असता संजयने गळफास घेतल्याचे दिसले. पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी संजयचा मृतदेह घाटीत हलविला. त्याचे सहा ते आठ महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुकुंदवाडी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गळफास घेऊन रिक्षाचालकाची आत्महत्या
By admin | Updated: November 16, 2015 00:41 IST