विशाल सोनटक्के , उस्मानाबादकुठल्याही गावाचं हृदय हे त्या गावचं ओढा असतो. तेच जर आंकुचन पावले तर मनुष्य कसा जगेल? अतिक्रमण, शोषण आणि प्रदुषण या तीन बाबीमुळे वाहणाऱ्या पाण्यामध्ये अवरोध निर्माण झाला आहे. याची झळ येणाऱ्या पिढीला सोसावी लागणार आहे. याबाबत जनजागरण करण्यासाठी जलबिरादारीच्या वतीने राज्यव्यापी ‘नदी-ओढा संवाद यात्रा’ काढण्यात येणार असल्याचे जलबिरादरीचे महाराष्ट्र संघटक सुनील जोशी यांनी सांगितले. जो पाणी पितो तो बिरादरीचा सदस्य, असे आम्ही समजतो. त्यामुळे या यात्रेमध्ये सर्वांनीच सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. पाणी आणि त्याच्याशी निगडित विषयाशी तांत्रिक, संघटनात्मक काम करणारे व्यासपीठ म्हणून जलबिरादारीकडे पाहिले जाते. राज्यभरातील पाणी प्रश्नाचा विचार केला असता, मराठवाड्यात कोरडवाहू जमीन मोठ्या प्रमाणात आहे. तर विदर्भात खारपण जमिनीचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रदेशनिहाय समस्या वेगवेगळ्या असल्या तरी भूगर्भातील पाण्याचा होत असलेला वारेमाप उपसा हेच या समस्येमागचे प्रमुख कारण आहे. अशा स्थितीत जमिनीमध्ये जास्तीत जास्त पाणी मुरविण्याकडे लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता असल्याचे जोशी यांनी सांगितले. यासाठी नदी-वीर-नारी-सन्मान या बाबीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. काही वर्षापूर्वी आपण नद्या-ओढ्यामध्ये अगदी सहजपणे वावरत होतो. मात्र अलिकडील काळात या स्त्रोतांची मोठी दुरवस्था झाली आहे. नद्यांच्या परिसरात झालेली अतिक्रमणे, वाळूचा मोठ्या प्रमाणात होत असलेला उपसा आणि वाढलेले प्रदूषण या तीन बाबी प्रामुख्याने यासाठी कारणीभूत आहेत. त्यामुळेच गाव आणि माणसाशी नद्या, ओढ्यांचे नाते जोडण्यासाठी ही यात्रा काढण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. नद्या पुनर्जिवित केल्याशिवाय पाण्याचा कायमस्वरुपी प्रश्न सुटणार नाही. हे समाजाला समजावून सांगण्याचे काम या माध्यमातून करण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये लोकांचा सहभाग आवश्यक आहे. सहभाग मिळण्यासाठी लोकांना निर्णय घेण्याचा आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. समाजाने एखाद्या बाबीची जबाबदारी घ्यावी असे वाटत असेल तर त्यासाठी त्याला जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागते. ही जाणीव करून देण्याचे काम जलबिरादारी या यात्रेच्या माध्यमातून करणार असल्याचे ते म्हणाले. लोकांमध्ये जाणीव निर्माण झाल्यानंतर पाणी तसेच सिंचनासारख्या उपक्रमासाठी होणारा करोडोचा खर्च योग्य ठिकाणी होईल. सद्यस्थितीत या यात्रेच्या नियोजनाचे कामे पुणे येथे सुरू असून, फेब्रुवारीमध्ये तुळजापूर येथून या यात्रेचा शुभारंभ करण्याचा मनोदय असल्याचे सांगत, राजेंद्रसिंह स्वत: यासाठी मार्गदर्शन करीत असून ही यात्रा थेट राज्यभरातील नागरिकांशी मुक्त संवाद साधणार असल्याचे ते म्हणाले. तूर, भुईमूग ही मराठवाड्याची खासीयत होती. मात्र मागील काही वर्षामध्ये यासह इतर पारंपारिक पिके मराठवाड्यातून हद्दपार होत असून, त्याची जागा ऊस, सोयाबीन घेत आहे. मागील काही वर्षात मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड वाढली आहे. खरे तर ही शेतकऱ्यांसाठी खुप मोठी धोक्याची घंटा आहे. एकाच पिकावर शेतकऱ्यांनी विसंबून राहू नये. किड तसेच इतर संकटे या पिकावर कोसळल्यास एखाद्या प्रदेशातील संपूर्ण अर्थ व्यवस्था धोक्यात येऊ शकते. याचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले.२०२० साली भारत महासत्ता म्हणून जगात उदयास येईल, असे सांगितले जात आहे. मात्र देशातील पाणी समस्या पाहता २०२० पर्यंत पाण्याअभावी जगात आपली मोठी पिछेहाट होण्याची भीती आहे. त्यामुळेच पाणीप्रश्न मुळातून समजून घेण्याची आवश्यकता आहे. पुढील तीन वर्षे चांगल्या पावसाची आहेत. असा आमचा अभ्यास सांगतो. याचा नेमका फायदा घेत, हे पावसाचे पाणी जमिनीत जास्तीत जास्त मुरविण्याचे नियोजन आपणा सर्वांना करावे लागणार असल्याचेही जोशी यांनी सांगितले.
नदी-ओढ्यांशी जुळविणार पुन्हा नाते
By admin | Updated: January 13, 2015 00:11 IST