औरंगाबाद : दहावी आणि बारावीचा निकाल लागल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रातील गर्दी वाढली आहे. प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांची सेतूत झुंबड उडत आहे. सध्या सेतूत रोज अडीच हजारांपेक्षा जास्त अर्ज येत आहेत. वाढती गर्दी लक्षात घेऊन सेतूची वेळ वाढविण्यात आली असून, घरपोच प्रमाणपत्र देण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे.बारावीचा निकाल जाहीर झाल्यापासून सेतू सुविधा केंद्रात विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे. दहावीचाही निकाल आज जाहीर झाला. त्यामुळे सेतूतील गर्दीत आणखी वाढ झाली आहे. रहिवासी, उत्पन्न, जात प्रमाणपत्र, नॉन क्रीमिलेअर, राष्ट्रीयत्व, ३० टक्के महिला आरक्षण, भूमिहीन आदी प्रमाणपत्रांसाठी मोठ्या संख्येने अर्ज येत आहेत. त्यामुळे सेतूवरील ताण वाढला आहे. सेतूत आठवडाभरापूर्वीपर्यंत रोज आठशे ते हजार अर्ज येत होते. आता ही संख्या अडीच ते तीन हजारांवर पोहोचली आहे. हा ताण लक्षात घेता प्रशासनाने वेळेत स्वाक्षरी होऊन प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी सेतूत दोन नायब तहसीलदार नियुक्त केले आहेत. शिवाय जात प्रमाणपत्रांवर स्वाक्षऱ्या करण्याचे काम तीन उपजिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे. तसेच सेतूत महिलांसाठी दोन स्वतंत्र खिडक्या सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच घरपोच प्रमाणपत्र देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. फोन केल्यानंतर सेतूचा कर्मचारी नागरिकांच्या घरी येऊन प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्र जमा करून घेत आहे. त्यानंतर आठवडाभरात घरपोच प्रमाणपत्र दिले जात आहे. या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
निकाल लागताच सेतूत गर्दी वाढली
By admin | Updated: June 18, 2014 01:35 IST