औरंगाबाद : शहरातील अनेक भागांना आज निर्जळीचा सामना करावा लागला. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन मुख्य जलवाहिन्यांसह शहरातील जलवाहिन्यांना लागलेल्या गळत्यांची डागडुजी करण्यासाठी आज पाणीपुरवठा बंद ठेवला होता. कंपनीने १ सप्टेंबरपासून काम सुरू केले असून, आज कंपनीने पहिल्यांदाच दुरुस्ती मोहीम हाती घेतली. त्यामुळे काही भागांना पाणीपुरवठा झाला, तर दुपारच्या वेळापत्रकातील अनेक वसाहतींना पाणीपुरवठा झाला नाही. जायकवाडी ते नक्षत्रवाडी एमबीआरपर्यंत पाणीपुरवठा करणाऱ्या ७००, १२००, १४०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिन्यांची निर्वहन क्षमता संपल्याने त्यांची चाळणी झालेली आहे. त्यामुळे त्यांना वारंवार गळती लागत आहे. कंपनीने काय केले कामजायकवाडी ते शहरादरम्यान या जलवाहिन्यांवर विविध ठिकाणी मोठ्या स्वरूपाच्या गळत्या आहेत. नक्षत्रवाडी, फारोळा, कोटला कॉलनी, क्रांतीचौक, ढोरकीन, विद्युत यंत्रणा, जुनाबाजार, मध्यवर्ती बसस्थानक येथील गळत्या दुरुस्तीसह जायकवाडी सबस्टेशन, जायकवाडी नवीन व जुन्या योजनेचे तसेच ढोरकीन, फारोळा येथे पंप दुरुस्ती, व्हॉल्व्हची दुरुस्ती व काही यांत्रिकी, विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीच्या कामांना सुरुवात केली. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी जलवाहिनीची ३८ ठिकाणची गळती दुरुस्त करणार आहे. तसेच ४ ठिकाणच्या मोठ्या गळत्यांची डागडुजी करणार आहे. ११ इलेक्ट्रॉनिक दुरुस्त्या, पंपिंग स्टेशन दुरुस्ती, व्हॉल्व्ह बदलणे, ईएसआरमधील तांत्रिक कामे शटडाऊनच्या काळात कंपनी करणार असल्याचे जनसंपर्क विभागाने कळविले आहे.
जलवाहिन्यांची दुरुस्ती; नागरिकांची भटकंती
By admin | Updated: September 16, 2014 01:36 IST