औरंगाबाद : मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणाचे दोन्ही कालवे दुरुस्तीवर आले आहेत. जागतिक बँकेकडून त्यासाठी निधी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असून, नोव्हेंबर २०२१ अखेर डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.
जायकवाडीच्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी किती खर्च लागणार याचा अंदाज नाही. तो हजार कोटींपेक्षा अधिकही असू शकतो. यामध्ये दोन्ही कालव्यांची अवस्था खराब झाल्यामुळे पन्नास टक्के जलवहन होते. त्यामुळे शेवटच्या भागापर्यंत पाणी पोहोचत नाही. या दुरुस्तीनंतर सर्वांना पाणी मिळण्याची व्यवस्था होणार आहे. रिक्त पदांबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यादृष्टीने अभियंत्यांच्या जागा भरण्यात येणार आहेत. तसेच इतर कर्मचारी आऊटसोर्स करण्यासाठी चर्चा सुरू आहे.
बंधाऱ्यांसाठी ५८२ कोटींचा निधी
मराठवाड्यात पूर्णा नदीवर चार बंधारे बांधण्यात येणार आहेत. यामध्ये पोटा, जोडपरळी, ममदापूर येथे हे बंधारे बांधण्यात येणार असून, त्यासाठी ५८२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तसेच कृष्णा मराठवाडा योजनेसाठी देखील जास्तीचा निधी दिला जात आहे. यावर्षी ६६६ कोटींचा निधी बजेटमध्ये दिल्याचा दावा पाटील यांनी केला.