औरंगाबाद : मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध असूनही वीज बिल न भरणार्यांची संख्या वाढत असल्याने औरंगाबाद शहर वगळता उर्वरित जिल्ह्याच्या ८ तालुक्यांमध्ये महावितरण ६ ते ९ तासांपर्यंत भारनियमन करीत आहे. परिणामी, अख्खा जिल्हा अंधारात बुडाला आहे. ग्रामीण भागात सुमारे अडीच लाख ग्राहकांकडे वीज बिलापोटी ७१६ कोटी रुपये थकले आहेत. यामुळे महावितरणने ७९ फिडरवर भारनियमन करणे सुरू केले आहे. जिल्ह्यात दररोज ४९६ मेगावॅट विजेची आवश्यकता असून, यापेक्षा अधिक वीजपुरवठा करण्याची क्षमता महावितरणकडे आहे. वीज नियामक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ग्रामीण भागात जिथे ४२ ते ४५ टक्क्यांपेक्षा अधिक वीज गळती, वीज चोरी, थकबाकी आहे, अशा ठिकाणी भारनियमन करण्याचे निर्देश दिले आहेत. पैठण तालुक्यात पैठण गावठाण, ढोरकीन, बालानगर, डावरवाडी, पिंपरवाडी, बिडकीन, रांजणगाव, कडेठाण, ढाकेफळ, पाचोड. औरंगाबाद तालुक्यात चौका, पोखरी. फुलंब्री तालुक्यात वारेगाव, जातेगाव, सावंगी. गंगापूर तालुक्यात पिंपरखेडा, गणेशवाडी, तुर्काबाद, रांजणगाव, वरखेडा, काटेपिंपळगाव. वैजापूर तालुक्यात टिळक रोड, वैजापूर टाऊन. सोयगाव तालुक्यात बनोटी, वाकडी, देव्हारी, मुखेडा, सावळदबारा. खुलताबाद तालुका परिसरातील वेरूळ, कागजीपुरा, बाजारसावंगी, येसगाव, गदाना, सुलतानपूर, तेसगाव, गल्लेबोरगाव. कन्नड तालुक्यात कन्नड टाऊन, अंबागावठाण, कालिमठ गावठाण, कोलवाडी गावठाण. पिशोर परिसरातील अंभई, नागद, बेलखेडा, नाचनवेल, डोंगरगाव, वासडी, करंजखेडा आदी ७२ फिडरवर भारनियमन होत असल्याने या परिसरात कमीत कमी ६ ते ९ तासांपर्यंत भारनियमन केले जात आहे. शेतीसाठीच्या वीजपुरवठ्यात तर १३ ते १४ तासांपर्यंत भारनियमन होत आहे. यामुळे गावकर्यांना सायंकाळ कंदिल, मेणबत्तीच्या उजेडातच काढावी लागत आहे. दिवसभर उन्हाच्या कडाक्याने गावकरी हैराण होत आहेत. वीज गळती व थकित वीज बिलामुळे या गावांमध्ये भारनियमन केले जात आहे. मात्र, जे प्रामाणिकपणे वीज बिल भरतात असे ग्राहकही या भारनियमनात भरडले जात आहेत. औरंगाबाद शहर वगळता जिल्ह्यात २ लाख ३१ हजार १६४ वीज ग्राहक आहेत. यातील घरगुती विजेचा वापर करणार्या ५२ हजार ६८८ ग्राहकांकडे १५ कोटी २० लाख रुपये वीज बिलापोटीची रक्कम थकित आहे. २,७९० व्यावसायिक ग्राहकांकडे २ कोटी ३ लाख व ५३४ औद्योगिक ग्राहकांकडे १ कोटी ६३ लाख थकबाकी आहे. सर्वाधिक थकबाकी शेतीसाठी वीज वापर करणार्या शेतकर्यांकडे आहे. १ लाख ७३ हजार ९५६ ग्राहकांकडे ६८१ कोटी ५८ लाख रुपये थकबाकी आहे. याशिवाय ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगर परिषद, अशा पाणीपुरवठा करणार्या ९९६ कार्यालयांकडे १६ कोटी १५ लाख रुपये थकबाकी आहे. २७ फिडर भारनियमनमुक्त ज्या फिडरवर ४२ टक्क्यांपेक्षा अधिक वीज गळती व थकबाकी आहे अशा फिडरवर भारनियमन करण्यात येत आहे. मात्र, ग्रामीण भागातील ग्राहकही आता अधिकृत मीटर बसवून नियमित बिल भरू लागले आहेत. असे १७ फिडर आम्ही भारनियमनमुक्त केले आहेत. तसेच आणखी १० फिडरवरील भारनियमनमुक्तीचा प्रस्ताव पाठविला आहे. अशा ठिकाणी २४ तास वीजपुरवठा केला जात आहे. मागील वर्षभरात ८ हजारपेक्षा अधिक ठिकाणची वीजचोरी पकडण्यात आली असून साडेतीन हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. विजेची कमतरता नाही. जेवढी मागणी वाढेल तेवढा वीजपुरवठा करण्याची आम्ही क्षमता निर्माण केली आहे. मात्र, वीज गळती व थकबाकीमुळे फिडरनुसार भारनियमन करण्यात येत आहे. लोकांनी वीज बिल भरले तर भारनियमन होणार नाही. -शंकर शिंदे, मुख्य अभियंता, महावितरण
वीज मुबलक तरीही भारनियमन
By admin | Updated: May 29, 2014 01:14 IST