सोमनाथ खताळ , बीडरस्ते व्यवस्थित, दुतर्फा झाडे, सर्व सोयी-सुविधा असलेली स्मार्ट सिटी कशी असावी याची रांगोळीच्या माध्यमातून उत्कृष्ट मांडणी करण्याचा प्रयत्न आदित्य इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला. निमित्त होते ‘इंजिनिअर्स डे’चे. वडवणी तालुक्यातील सोन्नाखोटा येथील प्रकल्पाचीही मांडणी करून पाणी बचत कशी करता येईल याबाबत जनजागृती करण्यात आली.भारतरत्न सर एम. विश्वेश्वरैय्या यांचा जन्मदिवस ‘इंजिनियर्स डे’ म्हणून साजरा होतो. आदित्य इंजिनिअरिंग महाविद्यालयातील सहा मुलांच्या ग्रुपने वेगळी क्लूप्ती अवलंबून दुष्काळावर कशी मात करता येईल, याबाबत वडवणी तालुक्यातील सोन्ना खोटा येथील प्रकल्पाची उभारणी केली. जिल्ह्यात बऱ्यापैकी पर्यटन स्थळे आहेत, परंतु नियोजनाचा अभाव आणि सुविधा नसल्यामुळे पर्यटक पुढे येत नाहीत. पर्यटन स्थळाच्या ठिकाणी लावलेल्या झाडांना देण्यासाठी पाणी नसते. त्यामुळे वृक्षांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. हाच धागा पकडून या मुलांनी प्रकल्पाची हुबेहुब उभारणी केली. असे प्रकल्प इतर ठिकाणीही उभारले तर परिसरातील सुमारे १५० ते २०० लोकांचा पाणीप्रश्न मार्गी लागेल. तसेच वृक्ष, जनावरांसह माणसांना पिण्यासाठी मुबलक पाणी राहिल. पर्यावरणाची जपवणूक झाल्यास दुष्काळ आपोआप नष्ट होईल, असा विश्वास या मुलांनी व्यक्त केला. महाविद्यालयाचे संचालक आदित्य सारडा यांनी प्रकल्पाची पाहणी केली. इतर विभागातील विद्यार्थ्यांनीही पाणी बचत, बेटी बचाव, वीज बचत, पर्यावरण संरक्षण, सायबर क्राईम आदि विषयांवर जनजागृती केली. परिसरात सर्वत्र रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. हा प्रकल्प शासनाने हाती घेतला तर खऱ्या अर्थाने बीड जिल्ह्याचा विकास होईल, असा विश्वास आदित्य सारडा यांनी व्यक्त केला. तहसीलदार मनिषा तेलभाटे, एस.टी.गिरगावकर, गिरीष गिल्डा, प्राचार्य के.ए.आडे, प्रा. जी.पी.देशमुख यांच्यासह विविध विभाग प्रमुख तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
रांगोळीतून साकारली ‘स्मार्ट सीटी’!
By admin | Updated: September 16, 2015 00:01 IST