शंकरनगर : हिप्परगामाळ येथे २३ एप्रिल रोजी रॉकेल टँकर - ट्रकच्या अपघातात टँकरचालक जागीच ठार झाला़ रामतीर्थ पोलिसांनी ट्रक हटविला़ पण टँकर रस्त्याच्या मध्यापर्यंत आडवे पडून राहिले़ अंधारातील टँकरला धडक बसल्यामुळे शेख बाबुमियाँ (रा़धानोरा, ता़नायगाव, ह़मु़ आदिलाबाद) हा वधूपिता जागीच ठार झाला़ यात रामतीर्थ पोलिसांवर अक्षम्य दुर्लक्षपणाचा आरोप होत आहे. देगलूरचे रॉकेल टँकर व नांदेडकडे जाणारा मालवाहू ट्रक यांच्यातील अपघातात टँकरखाली गेल्यामुळे टँकरचालक फकीरा निगारे (रा़हिंगोली) हे जागीच ठार झाले होते़ यानंतर पोलिसांनी या अपघातातील ट्रक नेवून रामतीर्थ ठाण्यात लावला़ हिप्परगा येथे घडलेल्या ट्रक-टँकर अपघातानंतर टँकरचे तोंड पश्चिमेला झाले आणि टँकर रस्त्याच्या मधोमध आडवे आले़ अपघातानंतर टँकरला रेडीयम पट्ट्या किंवा अन्य खूण न लावता किंवा टँकर डोझर, टिप्पर किंवा क्रेनच्या मदतीने बाजूला हटविण्याची तसदी रामतीर्थ पोलिसांनी घेतली नाही़ २५ एप्रिल रोजी शेख बाबूमियॉ हे आपल्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिका चिटमोगरा येथील नातेवाईकांना देवून रात्री पावणेआठच्या सुमारास शंकरनगर-नरसी दरम्यान असलेल्या हिप्परगामाळ जवळील घटनास्थळाजवळ आले़ ते आपल्या डाव्या बाजूने जात असताना समोरून आलेल्या वाहनाच्या उजेडामुळे ते टँकरच्या मागच्या बाजूस धडकले़ या धडकेमुळे त्यांच्या डोक्याचा भाग कापला गेला़ त्यामुळे ते जागीच ठार झाले़ रामतीर्थ पोलिसांनी टँकर जागेवरून हटविले नसल्यामुळेच हा अपघात घडला. दरम्यान, प्रकरण अंगावर येण्याची शक्यता वाटताच रामतीर्थ पोलिसांनी २६ एप्रिल रोजी सकाळी ८ च्या सुमारास डोझरच्या सहाय्याने टँकर रस्त्याच्या बाजूला सरकवून प्रकरण सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. (वार्ताहर)
रामतीर्थ पोलिसांचा हलगर्जीपणा; वधूपित्याचा हकनाक बळी
By admin | Updated: April 26, 2016 23:48 IST