विजय बगाटे , पूर्णारेल्वेस्थानक व धावत्या रेल्वे प्रवासी गाड्यांमधील प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे प्रवाशांना शारीरिक व मानसिक त्रास सोसावा लागत आहे. पूर्णा हे मराठवाड्यातील रेल्वेचे मोठे जंक्शन असून १०० वर्षाचा इतिहास पूर्णा रेल्वेस्थानकाला आहे. येथून मुंबई, दिल्ली, कलकत्ता, अमृतसर, भोपाळ, अलाहाबाद, तिरूपती, विशाखा पटनम, पाटना, मनमाड, हैदराबाद, सिकंदराबाद, नागपूर, अदिलाबाद, पंढरपूर, इंदौर, बंगळुरू, कोल्हापूर, बिदर यासह देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वे गाड्या दररोज व आठवडी टाईमटेबल्या हिशोबाने धावत असतात. या गाड्यांपैकी देवगिरी, नंदीग्राम व अजिंठा या दोन तीन गाड्या वगळता एकाही एक्सप्रेस गाडीला सुरक्षा व्यवस्था किंवा सुरक्षागार्ड ठेवले जात नाही. सर्व गाड्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे अनेक गाड्यांत चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पूर्णा रेल्वेस्टेशनवर रेल्वे सुरक्षा बलाचे स्वतंत्र कार्यालय आहे. परंतु अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सुरक्षा पुरविण्याविली जात नाही. नागपूर रेल्वे पोलिसांची चौकी असून पोलिस स्टेशन नांदेड येथे आहे. चौकीत केवळ दोन ते तीन कर्मचारी कार्यरत असल्यामुळे रेल्वेस्टेशनला देखील ते सुरक्षा देऊ शकत नाहीत. रेल्वेचे मोठे जंक्शन असताना देखील या ठिकाणचे रेल्वे पोलिस स्टेशन नांदेड येथे वर्ग करण्यात आल्यामुळे पूर्णा रेल्वे जंक्शनची सुरक्षा व प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यात आली आहे. दररोज ४० ते ५० लांब पल्ल्याच्या पॅसेंजर गाड्या पूर्णा येथून धावत असतात. या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या लक्षणीय आहेत. प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा नसते. अशा परिस्थितीत फेरीवाले ये-जा करतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे, अशा फेरीवाले व विक्रेत्यांवर रेल्वे पोलिसांच्या वतीने कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र असे होताना दिसून येत नाही. याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.तृतीयपंथ्यांची संख्या वाढलीया गाड्यांमधून भिकारी व तृतीयपंथी लोकांची संख्या वाढली असून सदरील लोक प्रवाशांना शारीरिक व मानसिक त्रास देण्याचे काम सतत करीत असतात. प्रवासी आपल्या गावाला जात असल्यामुळे तक्रार करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. या प्रकरणी रेल्वे विभागातील रेल्वे सुरक्षा बल व नागपूर रेल्वे पोलिस या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूर्णा जंक्शन या रेल्वेस्थानकाची व धावत्या प्रवासी गाडीतील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा व्यवस्था पुरावावी, अशी मागणी सामान्य प्रवासीवर्गातून होत आहे.
रेल्वेस्थानक,गाड्यांची सुरक्षा वाऱ्यावर
By admin | Updated: June 13, 2014 00:31 IST