औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेमध्ये नांदेड विभागातील रेल्वे रूळ क्षेत्रीय स्तरावर सर्वोकृष्ट ठरले आहेत. नांदेड रेल्वे विभागाला तीन ढाली मिळाल्या आहेत. उत्कृष्ट रेल्वे रूळ (बेस्ट ट्रॅक), उत्कृष्ट सुरक्षा आणि नवकल्पना यासाठी या तीन ढाल मिळाल्या आहेत.
भारतात १६ एप्रिल १८५३ ला पहिल्यांदा मुंबई ते ठाणेदरम्यान रेल्वे धावली होती. त्या क्षणाच्या स्मरणार्थ भारतीय रेल्वे दरवर्षी रेल्वे सप्ताह साजरा करत असते. यात रेल्वे सेवेत वर्षभर उत्कृष्ट कार्य करण्याऱ्या रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.
नांदेड विभागात ६५ वा रेल्वे साप्ताह पुरस्कार सोहळा सोमवारी पार पडला. पूर्णा, औरंगाबाद, अकोला येथे रेल्वे अधिकाऱ्यांनी डीआरएम पुरस्कारांचे वितरण केले. यावर्षी ११० व्यक्तिगत आणि २३ सांघिक पुरस्कार प्रदान करण्यात आले. या २३ सांघिक पुरस्कारामध्ये १२६ कर्मचाऱ्यांना रेल्वे पुरस्कार प्रदान करण्यात आला. गतवर्षी मुदखेड ते परभणीदरम्यान दुहेरीकरण पूर्ण करण्यात आले. तर सर्व रेल्वेस्थानकावर मोफत वाय-फाय सुविधा प्रदान करण्यात आली, अशी माहिती नांदेड विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.