बदनापूर : येथील सराफा विक्रेत्यांची दुकाने करवाढीच्या निषेधार्थ बंद आहेत. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सराफा व्यापाऱ्यांनी हातगाडीवर फळ विक्री केली.केंद्र सरकारने लावलेल्या करवाढीच्या निषेधार्थ बदनापूर येथील सर्व सराफा व्यापाऱ्यांनी २ मार्चपासून बेमुदत बंद आंदोलन सुरू केले आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे लग्नकार्य करणाऱ्या सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. सराफा व्यापाऱ्यांच्या कुटुंबाचाही उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु अद्यापही शासनाचे या आंदोलनाकडे दुर्लक्षच आहे.शासनाने या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहावे यासाठी बदनापूर येथील सराफा व्यापाऱ्यांनी केंद्र शासनाचा एक अगळावेगळा निषेध व्यक्त करून याकडे लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न केला आहे. आज येथील शिवाजी चौकात एका हातगाडीवर अंगूर, पपई, चिकू, अंजीर अशी विविध प्रकारची फळे विक्री करून सराफांच्या उदरनिर्वाहाकडे शासनाने बघावे हा संदेश देऊन निषेध व्यक्त केला. यावेळी किरण टेहरे, संतोष सारडा, प्रीतम रूणवाल, राजेंद्र गेलडा, योगेश झंवर, कैलास दुधानी, गोविंद गव्हाणे, कल्याण मदन, मनोज टेहरे, अमोल कटारिया, मदन मैड, श्रीराम मैड, रुपेश गंभिरे आदी सराफा संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)
फळविक्री करून सराफांनी केला सरकारचा निषेध
By admin | Updated: March 10, 2016 00:37 IST