बीड: पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला आहे. अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस झालेला नाही. जनावरांसाठी गवत आलेले नसल्याने चारा टंचाई निर्माण झाली आहे. ज्वारीच्या कडब्याचे भाव अव्वाच्या सव्वा झाले आहेत. काही पशुमालक गतवर्षीचा कडबा तीन ते साडेतीन हजार रूपये शेकडा भावाने विकत घेत असल्याचे चित्र जिल्हयात पहावयास मिळत आहे. जिल्हयात एकूण ८ लाख २५ हजार ४३४ एवढे पशुधन आहे. यामध्ये मोठी जनावरे ६ लाख ६८ हजार २६८ तर छोटी जनावरे १ लाख ५७ हजार १६६ च्या जवळपास आहेत. मागील तीन वर्षापासून बीड जिल्हयात अत्यल्प पाऊस पडत असल्याने बळीराजा पाणी टंचाई बरोबरच चारा टंचाईच्या संकटात सापडला आहे. अल्प पावसाचा फटका जसा नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याला बसत आहे. तसाच जणावरांच्या चाऱ्या संबंधी देखील बसत आहे. जिल्हयातील अंबाजोगाई, माजलगाव व वडवणी तालुका काही प्रमाणात वगळता आष्टी, शिरूर कासार, पाटोदा व बीड तालुक्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेवराई व धारूर तालुक्याची देखील परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. शेतकऱ्यांना दुध-दुभत्या जनावरांचा आधार असल्याचे सर्वत्र पहावयास मिळते. मात्र मागील दोन महिन्यात झालेल्या असमाधानकारक पावसाने दुग्ध उत्पादनाला फटका बसत असल्याचे शेतकरी श्रीराम वडमारे यांनी सांगितले.पशुधन विक्रीसाठी बाजारातआष्टी व शिरूर कासार तालुक्यात तर मागील तीन वर्षापासून पावसाने पाठ फिरवलेली असल्याने व यंदा देखील पावसाने दडी मारल्यामुळे जनावरांना खाऊ काय घालायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपली दुभती जनावरे बेभाव विकली असल्याचे येथील शेतकरी किसनराव नाईक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)०८लाख २५ हजार ४३४ इतके पशुधन जिल्ह्यात उपलब्ध आहे़ या सर्वांसाठी मुबलक चारा लागतो़०६लाख ६८ हजार २६८ मोठी जनावरे असून छोट्या जनावरांची संख्या १ लाख ५७ हजार १६६ आहे़१५हजार मे. टन इतका चारा प्रत्येक महिन्याला लागतो. पावसाअभावी गवत उगवले नसून चाऱ्याचा प्रश्न आहे़
कडब्याचे भाव साडेतीन हजारांपुढे
By admin | Updated: July 28, 2014 00:54 IST