आडूळ : ‘ब्राह्मणगाव तांडा अंधारात’ या मथळ्याखाली ४ मे रोजी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच, महावितरणने याची दखल घेत जळालेले सिंगल फेज विद्युत रोहित्र बसवून दिले. यामुळे खंडित असलेला वीजपुरवठा गुरुवारपासून सुरळीत झाला.
ब्राह्मणगाव अंतर्गत असलेल्या ब्राह्मणगाव तांड्याला आडूळ येथील ३३/११ केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो. या संपूर्ण तांड्याचा विद्युत भार एकाच सिंगल फेज रोहित्रावर आहे. हे रोहित्र बऱ्याच दिवसांपूर्वी जळाले होते. तेव्हापासून येथील ग्रामस्थांना अंधारात रात्र काढावी लागत होती. या प्रकरणाला लोकमतने वाचा फोडल्याने खडबडून जागे झालेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दुपारी हे जळालेले रोहित्र बसवून दिले व खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत केला. जळालेले रोहित्र बदलून देण्यासाठी आम्ही आडूळ येथील महावितरणच्या कार्यालयात पाठपुरावा केला. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. पण लोकमतमध्ये वृत्त छापून आल्याबरोबर रोहित्र बसवून मिळाले असल्याची प्रतिक्रिया गोर बंजारा ब्रिगेडचे ब्राह्मणगाव सर्कलचे अध्यक्ष सिद्धेश्वर राठोड यांनी व्यक्त केली.