बापू सोळुंके
औरंगाबाद : एकीकडे राज्य सरकार पोलीस भरतीची जय्यत तयारी करीत असताना औरंगाबाद शहर पोलिसांतर्फे किती पदांची भरती होणार याविषयी माहितीच उपलब्ध नसल्याचे समोर आले. दुसरीकडे औरंगाबाद ग्रामीण आणि भारत बटालियनतर्फे रिक्त पदांची माहिती शासनाला पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस भरती रद्द झाली, तर २०१९ साली लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आचारसंहितामुळे पोलीस भरती झाली नव्हती. रखडलेली पोलीस भरती तातडीने घ्यावी, अशी मागणी राज्यातील बेरोजगार तरुण करीत आहेत. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन टप्प्यात १२ हजार ५०० पोलिसांची पदे भरणार असल्याचे जाहीर केले. गृहमंत्री यांच्या घोषणेने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये उत्साह संचारला आहे. पोलीस भरतीकरिता औरंगाबाद शहर पोलिसांच्या अस्थापनेतर्फे किती पदे भरण्यात येणार आहे, याविषयी पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांना विचारले असता तांत्रिक कारणांमुळे सध्या ही माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांनी नमूद केले. अनुकंपा आणि जिल्हा बदलीसाठी काही पोलिसांनी अर्ज केलेले आहेत. ते अर्ज मंजूर झाले तर पदांची संख्या कमी जास्त होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
दुसरीकडे औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून ८९ पदे भरली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सांगितले. याबाबतची माहिती शासनाला पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सातारा येथील भारत बटालियनच्या अस्थापनेवर ३० पदे रिक्त असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. रिक्त पदांची माहिती शासनाला सादर करण्यात आली.
चौकट
भरती करण्याचे अधिकार
४० पेक्षा अधिक पदे रिक्त असेल तर स्वतः भरती करण्याचे अधिकार आस्थापनेला असतात. त्यापेक्षा कमी पदे भारत बटालियनची रिक्त आहेत. यामुळे शासनाच्या आदेशाने या रिक्त पदाची भरती प्रक्रिया औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाला अथवा शहर पोलीस आयुक्तालयास घेण्यास सांगितले जाऊ शकते.