औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलातर्फे २०१७ पासून एम पोलीस मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आणि समाधान हेल्पलाइनच्या माध्यमातून व्हॉट्सॲपवर ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी उपलब्ध करण्यात आली. या तक्रारी प्राप्त झाल्यावर सात दिवसांत त्यांच्या तक्रारीवर काय कार्यवाही झाली याबाबतचा अहवाल तक्रारदार पोलिसांना ऑनलाइन पाठविला जातो. अत्यंत महत्त्वाच्या या प्लॅटफॉर्मचा पोलीस अधिकारी, कर्मचारी उपयोग करून घेत असल्याचे निदर्शनास आले. गत वर्षभरात जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत या औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना ५५ तक्रारी प्राप्त झाल्या. बदली हवी, जोखीम भत्ता मिळत नाही, कार्यालयातील क्लार्क निलंबन कालावधीतील वेतन निश्चिती करून देत नाही, जिल्हा बदली द्यावी, अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घ्यावे, अशा स्वरूपाच्या बहुतेक तक्रारी आहेत.
वैजापूर तालुक्यातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलिसाचा लहान मुलगा मुत्रपिंडविकाराने त्रस्त होता. त्याच्यावरील उपचारांसाठी वारंवार रजा घेऊन औरंगाबादला येणे त्यांना परवडत नव्हते. ही बाब त्यांनी समाधान हेल्पलाइनच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या कानावर टाकली. तिची तक्रार वाचून पोलीस अधीक्षकांनी तिची तातडीने औरंगाबाद ग्रामीण पोलीस मुख्यालयात बदली केली. दुसऱ्या एका प्रकरणात अजिंठा ठाण्यात कार्यरत वाहनचालकाला एका पोलीस अधिकाऱ्याने शिवीगाळ केली होती. याविषयीची तक्रार त्यांनी समाधान हेल्पलाइनवर करताच त्या अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाहनचालक पोलीस कॉन्स्टेबलला वारंवार विनंती करूनही पोलीस अधिकारी रजा देत नाही आणि त्यांच्यासोबत उर्मट वागतात अशी क्लीप व्हायरल झाली होती. या क्लीपची दखल घेऊन त्या अधिकाऱ्याची चौकशी सुरू करण्यात आली. समाधान आणि एम पोलीस हेल्पलाइन पोलिसांसाठी वरदान ठरल्याचे दिसत आहे.
=========
जानेवारी ते डिसेंबर २०२० मध्ये प्राप्त तक्रारी
जानेवारी - ११
फेब्रुवारी - ९
मार्च - १०
एप्रिल - ६
मे - ५
जून - ०
जुलै - ३
ऑगस्ट - १
सप्टेंबर - ०
ऑक्टोबर - ०
नोव्हेंबर - ६
डिसेंबर - ४
=============
कोट
एम पोलीस आणि समाधान हेल्पलाइनच्या माध्यमातून पोलीस कर्मचारी आमच्याकडे ऑनलाईन तक्रार करू शकतात. याशिवाय ते परवानगी घेऊन (आज्ञांकित दिवस) प्रत्यक्ष भेटू शकतात. कोरोना कालावधीत आम्ही झूम ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची गाऱ्हाणी ऐकून घेतली. त्यांच्या तक्रारीचा कमीत कमी तीन दिवसांत आणि जास्तीत सात दिवसांत निपटारा केला जातो. या वर्षभरात आम्ही कर्मचाऱ्यांसाठी आज्ञांकित दिनी ३०० वेळा भेटलो. कर्मचाऱ्याच्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन निर्णय लगेच घेऊन प्रश्न सोडविला जातो.
=== मोक्षदा पाटील, पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण.