चेतन धनुरे, उदगीरउदगीर नगरपालिकेच्या हुतात्मा अन् गांधी उद्यानाची सध्या वाईट अवस्था बनली आहे़ गांधी उद्यानात तळीरामांनी तळ ठोकल्याने पालिकाही बेजार झाली आहे़ दुसरीकडे हुतात्मा उद्यानात पाण्याची सोय नसल्याने येथील हिरवळ संपुष्टात येत असून, आवारात लाकडं अन् पाचोळ्यांचा थर साचला आहे़नागरपालिकेने विकसीत केलेल्या हुतात्मा अन् महात्मा गांधी उद्यानात नागरिकांची चांगलीच वर्दळ असते़ त्यांची देखभाल ठेवल्याने लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकही याठिकाणी येत असतात़ परंतु, मागील काही महिन्यांपासून या दोन्ही उद्यानांची अवस्था वाईट बनली आहे़ पोलिस ठाण्यासमोरील गांधी उद्यानात तळीरामांनी त्रस्त करुन सोडले आहे़ शेजारीच मदिरालय असल्याने मद्यपी तेथून मद्य घेऊन गांधी उद्यानात तळ ठोकतात़ त्यामुळे जागोजागी बाटल्या अन् प्लास्टिकचे ग्लास आढळून येत आहेत़ येथील हिरवळीची मात्र चांगली निगा राखली गेली आहे़ दाट वृक्षांच्या सावलीमुळे दुपारच्या वेळी नागरिक विश्रांतीसाठी येत आहेत़ या उद्यानातच स्वच्छता विभागाचे कार्यालय आहे़ तरीही तेथील कर्मचाऱ्यांना न जुमानता तळीराम आपला उपद्रव सुरुच ठेवतात़ पालिकेच्या हुतात्मा उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी व नागरिकांना वाचनालयाची सोय असल्याने येथेही चांगली गर्दी होते़ परंतु, येथे पाणी उपलब्ध नसल्याने हिरवळ संपुष्टात येत आहे़ झाडांच्या पानगळीमुळे सर्वत्र पाचोळ्याचे थर दिसून येत आहेत़ तसेच सावलीही राहिली नसल्याने दुपारच्या वेळेत येथे शुकशुकाट दिसून येतो़
उदगीरच्या उद्यानांत तळीरामांचा तऴ़!
By admin | Updated: April 9, 2015 00:13 IST