लातूर : परशुराम जयंतीनिमित्त रविवारी समाज संमेलन घेण्यात आले. या संमेलनात तरुण, तरुण, ज्येष्ठ नागरिक, मध्यमवयीन नागरिकांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. कस्तुराई मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी अॅड. संजय पांडे यांनी समाज संकल्पना मांडली. यावेळी अनिरुद्ध कुलकर्णी, अपर्णा गोवंडे, शिरीष पोफळे, अनघा अंधोरीकर, जयंत चौधरी यांनी तरुण, तरुणी, ज्येष्ठ नागरिक, मध्यमवयीन नागरिकांच्या समस्या समाज संमेलनात मांडल्या. प्रभाकर उदगीरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समाज संमेलनात समाजातील या घटकांच्या समस्यांवर चर्चा करून तोडगा काढण्यावर चर्चा करण्यात आली. श्री परशुराम जयंती सोमवारी साजरी होत आहे. त्यानिमित्त समाज संमेलन घेण्यात आले. विवेकानंद संस्कार संस्थेच्या वतीनेही विविध कार्यक्रम घेण्यात आले. रक्तदान शिबीर, व्याख्यान, विद्यार्थी इमारतीचे भूमिपूजन, आरोग्य शिबीर आदी कार्यक्रम झाले. समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी भव्य वसतिगृह उभारण्यात येणार असून, २ हजार स्क्वेअर फुटांच्या भूखंडावर वसतिगृहाची वास्तू साकारली जाणार आहे. वसतिगृहासाठी २ हजार स्क्वेअर फुटांचा भूखंड अॅड. शंकरराव बेंडकाळकर यांनी दान दिला आहे. त्या भूखंडावर आता समाजातील मुलांसाठी भव्य वसतिगृह साकारले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.वसतिगृहाच्या भूमिपूजनाला डॉ. ज्योत्स्नाताई कुकडे, डॉ.एम.एस. कुलकर्णी, श्रीधराचार्य संदीकर, प्रभाकरराव उदगीरकर, सदाशिवराव दाते, अॅड. कमलाकरराव निटूरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
परशुराम जयंतीनिमित्त समाज संमेलन
By admin | Updated: April 20, 2015 00:32 IST