बीड : शिक्षकांकडून समाजाला फार मोठ्या अपेक्षा आहेत. शिक्षक हा विद्यार्थ्यांसोबत समाजाला दिशा देत असतो. मात्र, जिल्ह्यात ऊसतोड मजुरांच्या पाल्यांच्या शिक्षणाची होणारी ससेहोलपट म्हणजे शिक्षकांचे अपयश समजावे लागेल, अशा शेलक्या शब्दांत शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी खडेबोल सुनावले.यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मंगळवारी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत शिक्षण परिषद पार पडली. यावेळी सीईओ नामदेव ननावरे, शिक्षण उपसंचालक व्ही.के. खांडके, डेप्युटी सीईओ धनवंतकुमार माळी, सुभाष कांबळे, शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुधीर देवगावकर, शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर, विक्रम सारुक उपशिक्षणाधिकारी अकसरी शेख, हिरालाल कराड यांची उपस्थिती होती.यावेळी नंदकुमार म्हणाले, शिक्षकांनी स्वत:ला झोकून देऊन ज्ञानदान केले तर शाळांची गुणवत्ता उंचावल्याशिवाय राहत नाही. विद्यार्थ्यांना आता पारंपरिक पद्धतीने अध्यापन न करता ज्ञानरचनावाद यासारख्या प्रगतशील उपक्रमांची जोड देणे आवश्यक बनले आहे. शाळा बोलक्या झाल्या, विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण दिले तरच त्यांना शाळेची गोडी लागेल. शाळाबाह्य विद्यार्थी केवळ शैक्षणिक वातावरणाच्या अभावामुळे शिक्षणापासून वंचित आहेत, असेही ते म्हणाले.यावेळी सीईओ नामदेव ननावरे यांच्यासह इतर मान्यवरांची भाषणे झाली. प्रास्ताविक शशिकांत हिंगोणेकर यांनी केले. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी जी.एन. चोपडे यांनी केले. यावेळी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विस्तार अधिकारी तुकाराम पवार, भगवान सोनवणे, संगणकतज्ज्ञ सुरेंद्र रणदिवे यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
‘शाळाबाह्य विद्यार्थी हे शिक्षकांचेच अपयश’
By admin | Updated: January 10, 2017 23:54 IST