आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक मतमोजणी सोमवारी पार पडली. यात ११ जागेसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वच ११ ही जागेवर सर्वपक्षीय पुरस्कृत खंडेश्वर शेतकरी विकास पॅनलने बाजी मारली असून, या अगोदर १८ संचालकापैकी ७ उमेदवार बिनविरोध आल्याने खंडेश्वर पॅनलने सर्व १८ जागांवर वर्चस्व मिळविले.परिसरातील तब्बल ५० गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या आष्टी बाजार समितीत झालेल्या निवडणुकीत अपक्ष विरूद्ध सर्वपक्षीयामध्ये दोन्ही काँग्रेस, भाजपा-शिवसेना एकत्र आले होते. रविवारी ११ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. यासाठी २० उमेदवार निवडणूक रिंंगणात होते. सोमवारी निकाल जाहीर करण्यात आला. यात सूर्यकांत बरकुले, सुरेश खरात, दिगंबर राऊत, सुखलाल राठोड, सिद्धेश्वर सोळंके, सुरेश सोळंके, निळकंठ तौर, अशोक कांबळे, निर्मला ढवळे, पार्वती कणसे, संभाजी मोरे विजयी झाले. तर शांताबाई करपे, मंदाबाई नळगे, अर्जुन राठोड, रामप्रसाद थोरात, शांताराम शिंदे, रंगनाथ येवले, राजेंद्र बाहेती हे सात उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते.विजयी उमेदवारांचा बाजार समितीमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी राहुल लोणीकर, बळीराम कडपे, विलासराव आकात, मदन सिंगी, कुणाल आकात, राजेभाऊ तौर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी.आर. नलावार, पी.व्ही. गावंडे, एस.डी. देवरे, शरद तनपुरे, कैलास मुजमुले, किरण नंदापूरकर आदींनी काम पाहिले. (वार्ताहर)
आष्टी बाजार समितीवर सर्वपक्षीय पॅनलचे वर्चस्व
By admin | Updated: August 18, 2015 00:50 IST