औरंगाबाद : राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊन नवीन सरकार आले. नवीन सरकारने कारभार सुरू करून दोन महिनेही उलटले; पण तरी भूमी अभिलेख खात्याच्या लेखी मात्र अजूनही जुनेच सरकार आहे. भूमी अभिलेखच्या उपसंचालक कार्यालयात जुन्याच सरकारातील मंत्र्यांच्या नावाच्या पाट्या झळकत आहेत. या पाट्या उतरविण्याचे भान येथील अधिकाऱ्यांना राहिलेले नाही.पंधरा वर्षांनंतर राज्यात सत्तांतर झाले. काँग्रेस आघाडीचे सरकार जाऊन भाजपा-सेनेचे सरकार आरुढ झाले. हा बदल होताच सर्वच सरकारी कार्यालयांनी त्यांच्या बेवसाईटस् अपडेट केल्या. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची नावे असलेल्या पाट्या उतरविण्यात आल्या; परंतु भूमी अभिलेख खात्याच्या लेखी मात्र अद्याप जुनेच सरकार कार्यरत आहे. भूमी अभिलेखच्या उपसंचालक कार्यालयात मागील सरकारमधील मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची नावे असलेले मोठे फलक झळकत आहेत. भूमी अभिलेख खात्याला गतिशीलता असे मोठे मथळे असलेले हे फलक असून, त्यावर मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि महसूलमंत्री म्हणून बाळासाहेब थोरात यांची नावे आहेत. विशेष म्हणजे राज्याचे नवीन महसूलमंत्री एकनाथ खडसे आतापर्यंत तीन वेळा औरंगाबाद दौऱ्यावर येऊन गेले. त्यांनी महसूल आणि भूमी अभिलेख खात्यातील अधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या. उपसंचालक कार्यालयात अगदी दर्शनी स्थळी हे फलक लावलेले आहेत. यापैकी एक फलक तर उपसंचालक प्रदीप पाटील यांच्या केबिनसमोरील पोर्चमध्ये लावलेला आहे. त्यांना केबिनमध्ये प्रवेश करण्यासाठी या फलकासमोरून जावे लागते. तरीही हा फलक अजून तिथे असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
भूमी अभिलेखमध्ये जुनेच सरकार
By admin | Updated: January 6, 2015 01:10 IST