उस्मानाबाद : मागील चार वर्षापासून जिल्हा तीव्र दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे. दुष्काळग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी पक्ष नेहमीच अग्रभागी राहिल्याचे सांगत, दुष्काळी परिस्थितीमुळे गांजलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याचा उपक्रम राबविण्यात येणार असून, या कन्यादान योजनेच्या माध्यमातून पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील १ हजार शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह लावून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांनी दिली. मागील कालावधीत मोठ्या प्रमाणात संघटनात्मक काम करण्यात यश मिळाले आहे. त्यामुळेच पक्ष प्रमुखांनी आदेश दिल्यास शिवसेना यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढेल, असेही त्यांनी सांगितले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे. टंचाई परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मागील दीड वर्षाच्या काळात विविध उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी जिल्ह्यातील ५४ सर्कलमध्ये मागील वर्षी शेतकरी आत्महत्या बचाव जनजागरण दिंडी काढण्यात आली. या दिंडीच्या माध्यमातून सात दिवस जिल्ह्याच्या विविध भागात रथ घेऊन गेलो. तसेच पोवाडे, भारूड आदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उद्बोधन केले. जनजागरण दिंडीसोबत सात दिवस मुक्कामी राहून शेतकऱ्यांशी संवाद साधला. एखाद्या पक्षाने अशा पद्धतीचा उपक्रम प्रथमच राबविल्याने या उपक्रमाला मोठे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. केवळ एवढ्यावरच न थांबता पक्षाच्या वतीने एक हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा हजार अशी एक कोटीची मदत केली. या उपक्रमामुळे गरजू शेतकऱ्यांना पेरणी तसेच इतर किरकोळ कामासाठी रोख रक्कम देता आली. शेतकरी आत्महत्येची दुर्दैवी घटना पुढे आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी स्वत: जाऊन त्यांची भेट घेतली. अशा आत्महत्याग्रस्त २० शेतकऱ्यांना पक्षाच्या वतीने तात्काळ २५ ते ५० हजार रुपये रोख रक्कम दिल्याचे सांगत, याच उपक्रमाचा पुढचा भाग म्हणून आता जिल्ह्यात ‘शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने दुष्काळग्रस्त भागाचा अभ्यास केला. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. तेव्हा अनेक शेतकऱ्यांनी केवळ मुलीच्या विवाहासाठीच्या खर्चाच्या तणावातून आत्महत्या केल्याचे पुढे आले. त्यामुळेच पक्षाच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींचे मोफत विवाह सामूदायिकरित्या राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. या सामूहिक विवाहात नावनोंदणी करण्यासाठी शेतकऱ्याला फक्त मुलीच्या जन्म प्रमाणपत्राची प्रत द्यावी लागणार आहे. लग्नाचा सर्व खर्च पक्षाच्या वतीने करण्यात येणार असून, यासाठीची नोंदणी इच्छुक शेतकऱ्यांनी संबंधित भागातील शाखा प्रमुखाकडे करावयाची आहे. लग्नासाठीचे सर्व साहित्य तसेच जेवणाची व्यवस्थाही पक्षातर्फे करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
शिवसेना राबविणार आता कन्यादान योजना
By admin | Updated: January 30, 2016 00:23 IST