औरंगाबाद : ‘पोखरी - पळशी’ सबस्टेशनवरील ११ के.व्ही. आडगाव कृषी वाहिनी फिडरवर लोड येत होता. मागील तीन वर्षांपासून ही समस्या असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी दररोज अडचणी येत होत्या. उपविभाग हर्सूल ग्रामीण शाखेने एबी स्वीचचा वापर करून तीन वर्षांपासून असलेली समस्या सोडविली. त्यामुळे आडगाव फिडवरील पळशी शहर, बकापूर, श्यामवाडी, माहोली, पीरवाडी यासह इतर गावांतील शेतकऱ्यांची पिकांना पाणी देण्यासाठी येणारी अडचण दूर झाली आहे.
शेतीमालावर प्रक्रिया करून प्रगती साधा
औरंगाबाद : शेतमालावर प्रक्रिया करून शेतकऱ्यांनी आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायन तंत्रज्ञान विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. भगवान साखळे यांनी केले. ग्रामविकास संस्थेतर्फे आयोजित शेतमालावर प्रक्रिया या वेबिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे, महादेव संगमे, बालाजी बिरादार, रवी सातदिवे, निवृत्ती घोडके, बंडू भालेकर, रूपाली शिवपुरे, अजिंक्य गायकवाड आदींची उपस्थिती होती.