संतोष हिरेमठ , औरंगाबाद औरंगाबाद : देशभरातील मॉडेल रेल्वेस्थानकांमध्ये औरंगाबादच्या स्थानकाचा समावेश आहे; परंतु येथे नावालाच असलेले मेटल डिटेक्टर, अपुरी सुरक्षा व्यवस्था, अनेक रेल्वेगाड्या वारंवार उशिरा धावणे, गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येणार्या गाड्यांची मागणी पूर्ण होत नसल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे केवळ रेल्वेस्थानकाची इमारत मॉडेल असल्याचे सध्या दिसून येते. केवळ रेल्वेस्थानकच मॉडेल नको, तर त्याबरोबर सुविधाही मॉडेल हव्यात, अशी मागणी होत आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या सर्वाधिक उत्पन्न देणार्या स्थानकांपैकी एक स्थानक म्हणून औरंगाबादची ओळख आहे. दिवसभरात प्रवासी आणि मालवाहतूक अशा जवळपास ८० रेल्वेगाड्या ये-जा करतात. पर्यटनाची राजधानी असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा सुरू असते; परंतु प्रवाशांना अनेक सुविधा मिळत नसल्याचे दिसून येते. मॉडेल रेल्वेस्थानकाच्या पहिल्या टप्प्यात नवीन इमारत बांधण्यात आली. या ठिकाणी प्रत्यक्षात कामकाजही सुरू झाले. त्यानंतर मात्र, मॉडेल रेल्वेस्थानकाच्या पुढील टप्प्याचे काम रखडले गेले. मॉडेल रेल्वेस्थानकात पिण्याचे पाणी, अस्वच्छता, सुरक्षा अशा अनेक समस्या, गैरसोयी दिसून येतात; परंतु त्याकडे दक्षिण मध्य रेल्वेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. रेल्वेस्थानकावरील मेटल डिटेक्टर कायम बंद राहतात. तसेच मेटल डिटेक्टर सुरू असले तरी त्यातूनच प्रवासी जाईल अशी काळजी घेतली जात नाही. रेल्वेस्थानकाच्या जुन्या इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असून नव्या इमारतीत अद्यापही ते बसविण्यात आलेले नाहीत. रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस अपुर्या कर्मचारी संख्येला सामोरे जात आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावरील सुरक्षाव्यवस्था अपुरी पडत आहे. एक्सलेटरची सुविधा रेल्वेस्थानकावर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लिफ्टची सुविधा सुरू झाली. लिफ्ट वापरण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे दादर्यावरून अवजड सामान नेताना सर्वसामान्य प्रवाशांबरोबर ज्येष्ठांची दमछाक होत आहे. त्यामुळे स्थानकावर नांदेडप्रमाणे एक्सलेटरची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. मालधक्क्याची जागा अपुरी रेल्वेस्थानकावरील मालधक्क्याची जागा अपुरी पडत आहे. व्यापारी, हमाल यांना बसायला जागा नाही. ट्रक उभे करण्यासाठीही जागा अपुरी पडते. मालधक्क्यासाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. -फय्याज खान, अध्यक्ष, औरंगाबाद गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन४पर्यटनाच्या राजधानीवरून दिल्लीसाठी सध्या एकमेव सचखंड एक्स्प्रेस आहे; परंतु या गाडीचे आरक्षण नेहमीच वेटिंगवर असते. त्यामुळे औरंगाबाद- कटरा ही रेल्वे, अमरनाथ यात्रेसाठी नांदेडहून औरंगाबादमार्गे मनमाड, भुसावळ, खंडवा, भोपाळ, दिल्लीवरून जाणारी विशेष रेल्वे, हैदराबाद- औरंगाबाद- अजमेर ही रेल्वे नियमित करणे, कोल्हापूर- औरंगाबाद- धनबाद- दीक्षाभूमी एक्स्प्रेस आठवड्यातून दोन वेळा सुरू करावी. जालना, नगरसोल डेमो रेल्वेच्या दोन फेर्या वाढविण्यात याव्यात, अशा विविध मागण्या होत आहेत.औरंगाबाद स्थानकावर धावणार्या रेल्वेगाड्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे त्यांची स्वच्छता करण्यासाठी पिटलाईन असावी, अशी मागणी करण्यात येत आहे; परंतु पिटलाईनचा मुद्दा केवळ विचारधीन असल्याचे रेल्वेच्या अधिकार्यांकडून सांगण्यात येते. त्यामुळे प्रत्यक्षात पिटलाईन कधी होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. असमाधानकारक प्रशासनाची वाटचाल मॉडेल रेल्वेस्थानकाची पाहिजे तशी वाटचाल होत नसल्याचे दिसत आहे. तीन टप्प्यांत होणार्या मॉडेल रेल्वेस्थानकाच्या केवळ एकाच टप्प्यातील काम झाले आहे. सुरक्षाव्यवस्थेकडे दुर्लक्ष केले जात आहे. गुजरात, राजस्थानसह विविध मार्गांवर गाड्या सुरू करण्याची आणि पिटलाईनची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. -ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती दुहेरी मार्ग व्हावा नांदेड ते मनमाड धावणार्या रेल्वेगाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे वेळोवेळी गाड्या उशिरा धावण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे मनमाड ते मुदखेडपर्यंत दुहेरी रेल्वेलाईन होण्याची आवश्यकता आहे. रेल्वेलाईनच्या दुरुस्ती आणि देखभालीकडे रेल्वे विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी अधिक निधी वापरला पाहिजे. -संतोषकुमार सोमाणी, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे प्रवासी सेना
स्थानक नव्हे, सुविधाही मॉडेल हव्यात
By admin | Updated: May 29, 2014 01:13 IST