१०० टक्के पदभरती, पदोन्नती करा
परिचारिकांची निदर्शने : ...तर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा
औरंगाबाद : कोरोना महामारीत परिचारिका जिवाची बाजी लावून लढत आहेत. पण राज्य शासनाने त्यांचे फक्त शाब्दिक कौतुक न करता केंद्र शासनाप्रमाणे भत्ता देणे, १०० टक्के पदभरती आणि पदोन्नती करणे, अशी मागणी करीत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर निदर्शने करण्यात आली.
शासनाने परिचारिकांची ५० टक्के रिक्त पदे भरण्यासाठी परवानगी दिली आहे. परंतु कोरोनाची दुसरी लाट, संभाव्य तिसरी लाट आणि नियमित रुग्णसेवेचे गांभीर्य घेऊन रिक्त पदे कायमस्वरूपी भरण्यात यावी, मृत परिचारिकांच्या कुटुंबीयांना विनाविलंब ५० लाखाचा विमा लाभ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. परिचारिकांना केवळ रुग्णसेवेची कामे देण्यात यावे, कार्यालयात लिपिक उपलब्ध करून दिल्यास कारकुनी कामकाज करणाऱ्या परिचारिका रुग्णसेवेसाठी उपलब्ध होऊ शकतात. मागण्या पूर्ण न झाल्यास २५ जूनपासून बेमुदत संपावर जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे संघटनेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. निदर्शनाप्रसंगी संघटनेच्या सहसरचिटणीस जना मुंढे, सदस्य अनसूया सावरगावे, कुसुम भालेराव, अनिता नागरगोजे आदींची उपस्थिती होती.
फोटो ओळ..
जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर विविध मागण्यांसाठी निदर्शने करताना परिचारिका.