सितम सोनवणे , लातूरलातूर शहरातील मिनी मार्केट भागातील मनपाच्या उद्यानाला अवकळा आली असून, वाळलेल्या गवतावरील मोडलेले झोपाळे अन् तुटलेल्या घसरगुंडीमुळे नागरिकांचा ऐन उन्हाळ्यात हिरमोड होत आहे.लातूर महापालिकेच्या दुर्लक्षामुळे मिनी मार्केट भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील हिरवळ वाळली आहे. त्यामुळे चिमुकल्यांसह पालकांची तारांबळ होत आहे. पाण्याअभावी अर्ध्या बागेतील गवतच नष्ट झाले आहे़ बालकांसाठी तयार करण्यात आलेले झोपाळे तसेच लोखंडी साहित्याची मोडतोड झाली असून काही साहित्य गंजून गेले आहे़ तर मुलांना खेळण्यासाठी बांधण्यात आलेले साहित्य तुटण्याच्या अवस्थेत आले आहेत़ त्यामुळे चिमुकल्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.मनपाच्या या उद्यानात बालकांना खेळण्यासाठी जोड असलेले चार झोपाळे तयार करण्यात आले होते़ त्यातील चारही झोपाळे तुटलेले असून ते गायब झाले आहेत़ पाण्याअभावी कारंज्यासाठी बनविण्यात आलेला हौद कोरडाठाक पडला आहे़ उन्हाळ्यामुळे झाडांची पानगळ होत आहे़ पडलेल्या पानांचा कचरा मोठ्या प्रमाणात जमा झाला आहे़ तो सर्व कचरा याच बागेत मोठा ढिग बनवून इथेच साठविला जातो. हा ढिग उचलला जात नसल्यामुळे मोठी दुर्गंधीही पसरली आहे. मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे.
मनपाच्या उद्यानाला अवकळा
By admin | Updated: April 11, 2015 00:19 IST