कन्नड : महावितरणने कृषिपंप वीज धोरण जाहीर केले आहे. हे धोरण शेतकऱ्यांच्या फायद्याचे असल्याचे प्रतिपादन महावितरणचे कन्नड विभागातील कार्यकारी अभियंता अभिजित सिकनिस यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी कन्नड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन गायकवाड व पिशोरचे सचिन परदेशी उपस्थित होते.
कन्नड विभागांतर्गत १ लाख ८ हजार ५९१ कृषिपंप ग्राहक असून, त्यांच्याकडे १ हजार २०३ कोटी थकबाकी आहे. त्यापैकी ४६९ कोटी सूट प्रस्तावित असून ७३४ कोटी रुपये निव्वळ थकबाकी आहे. निव्वळ थकबाकी मार्च २०२१ अखेर भरल्यास त्यापैकी ५० टक्के माफी मिळणार आहे.
वीज बिलात मिळणारी सवलत
सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील विलंब आकार व व्याज माफी. वीज बिल वसुलीकरिता ग्रा.पं.ना प्रोत्साहन
कृषी ग्राहकांसोबत इतर वसुलीची कामे, ग्राहकांकडील थकबाकीमधून ग्रा.पं.द्वारे वाढीव वसुली क्षमतेच्या वसुलीवर २० टक्के मोबदला, तसेच चालू बिलांच्या वसुलीसाठी वाढीव वसुलीवर मोबदला.,
जमा रकमेतून कृषी ग्राहकांना पायाभूत सुविधा
संबंधित ग्रामपंचायतीकडून जमा झालेल्यामधून ३३ टक्के रक्कम महावितरणच्या विभागीय पातळीवर उपलब्ध निधीनुसार त्या ग्रा.पं.त कृषिपंप ग्राहकांसाठी पायाभूत सुविधा सुधारण्याकरिता वापरला जाईल. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीकडून एकत्रितपणे वसूल झालेल्या ३३ टक्के रकमेपर्यंतचा वापर जिल्ह्याचे पालकमंत्री व महावितरणच्या अधीक्षक अभियंता यांच्या मंजुरीने त्या जिल्ह्यातील कृषिपंप ग्राहकांसाठी पायाभूत सुविधा सुधारण्याकरिता वापर होणार असल्याचे सिकनीस यांनी सांगितले.