औरंगाबाद : दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून उपक्रम राबविण्याची जबाबदारी पक्षाने औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडे सोपविली आहे. पालकमंत्री कदम यांनीच औरंगाबादेत रविवारी ही माहिती दिली. विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पहिल्यांदाच रामदास कदम शनिवारी औरंगाबादेत आले होते. खा. चंद्रकांत खैरे यांच्या मुलीच्या लग्नासाठी ते औरंगाबादेत आले होते. घरचे लग्न आहे, म्हणून खास एक दिवस अगोदरच आलो असेही कदम म्हणाले. मी औरंगाबादचा पालकमंत्री असलो तरी आता माझ्यावर मराठवाड्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यामुळे विभागातील सर्वच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी झोकून देऊन काम करणार आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारी पातळीवरून काम सुरूच आहे. तरीही शासन जिथे कमी, तिथे आम्ही या पद्धतीने शिवसेना शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र काम करत आहे. पक्षाच्या वतीने प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मदत देण्याचे काम केले जाणार आहे.
कदमांवर सोपविली मराठवाड्याची धुरा
By admin | Updated: January 4, 2016 00:21 IST