जालना : जिल्ह्यात गतवर्षी प्रशासकीय मान्यता मिळालेल्या १८८ पैकी काही अंगणवाड्यांच्या कामाचा निधी अद्याप संबंधित ग्रामपंचायतींकडेच पडून असल्याची माहिती हाती आली आहे. तर उर्वरित ६९ अंगणवाडी इमारतीच्या कामासाठी अद्याप निधीचा प्रश्न कायम आहे. जिल्ह्यात एकूण १९५४ अंगणवाड्या आहेत. २००८-०९ पर्यंत जवळपास अंगणवाड्या किरायाच्या जागेत किंवा काही ठिकाणी ग्रामपंचायतींमध्येच भरत होत्या. परंतु त्याच वर्षी जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हा वार्षिक योजनेतून अंगणवाड्यांच्या इमारतीसाठी टप्प्याटप्प्याने निधीची मागणी केली. त्यानुसार दरवर्षी अंगणवाड्यांच्या इमारत बांधकामासाठी निधी मिळत गेला. २०१३-१४ मध्ये २५७ अंगणवाड्यांच्या इमारतीचे बांधकाम बाकी होते. पूर्वी अंगणवाड्यांना प्रत्येकी साडेचार लाखांचा निधी दिला जात होता. त्यानुसार या अंगणवाड्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. परंतु शासनाने खर्चाची मर्यादा सहा लाखांपर्यंत वाढविली. त्यामुळे उपलब्ध निधीतून २५७ अंगणवाड्यांचे बांधकाम होणे शक्य नव्हते. परिणामी पूर्वीच्या प्रशासकीय मान्यता रद्द करून प्रशासनाने नव्याने १८८ अंगणवाड्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे ६९ अंगणवाड्यांचे काम लांबणीवर पडले. या अंगणवाड्यांना अद्याप निधी मंजुर झालेला नाही. परंतु ज्या १८८ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली, त्यापैकी काही ग्रामपंचायतींकडे निधी अद्याप पडून असल्याचे समजते. उर्वरीत ग्रामपंचायतींनी अंगणवाडी इमारतींची कामे सुरू केलेली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार काही ग्रामपंचायतींमध्ये अद्याप कामाच्या निविदाच निघालेल्या नाहीत. या कामांच्या ई-निविदा निघणे अपेक्षित आहेत.६९ ग्रामपंचायतींना अंगणवाडी इमारतीसाठी अद्याप निधी मिळालेला नाही. परंतु तोही आता मिळेल, असा विश्वासही सूत्रांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)जिल्ह्यात ज्या ग्रामपंचायतींना अद्याप अंगणवाडी इमारतींच्या बांधकामासाठी निधी देण्यात आलेला नाही, त्यांना निधी द्यावा, अशी मागणी त्या-त्या ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. जेणे करून त्या ठिकाणच्या अंगणवाडी इमारतीचे कामही लवकर होईल.४१८८ ग्रामपंचायतींपैकी किती ग्रामपंचायतींनी अद्याप निधी खर्च केला नाही, याविषयी जिल्हा परिषदेच्या प्रशासनातर्फे लवकरच आढावा घेण्यात येणार असल्याचे समजते.
अनेक अंगणवाडी इमारतीचा निधी पडून
By admin | Updated: December 12, 2014 00:52 IST