औरंगाबाद : दीड वर्षांत कोरोना संसर्गाने मृत्युमुखी पडलेल्या सुमारे दोन हजार मृतदेहांवर महापालिकेतर्फे अंत्यसंस्कार करण्यात आले. यासाठी स्मशानजोग्यांनी तब्बल ५० लाख रुपयांची उधार, उसणवारी करून सरणाची लाकडे आणली. या सरणाचा खर्च व स्मशानजोगींचे चार महिन्यांचे वेतनही मनपाने थकविले आहे.
मनपा एका मोफत अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा खर्च म्हणून स्मशानजोगींना अडीच हजार रुपये देते. मात्र ही रक्कम वेळेत मिळत नसल्याने स्मशानाजोगी त्रस्त आहेत.
कोरोना काळात मृतदेहांवर केलेल्या अंत्यसंस्काराचे पैसे मिळत नसल्याने स्मशानजोगींनी पालिकेत येऊन संताप केला. पुष्पनगरी स्मशानभूमीचे स्मशानजोगी गोविंद गायकवाड यांनी सांगितले की, चार महिन्यांतील लाकडाचे पैसे आणि वेतन नसल्यामुळे आम्ही आर्थिक अडचणीत सापडलो आहोत. पुष्पनगरी स्मशानभूमीत एका हजारांपेक्षा अधिक मृतदेहांवर चार महिन्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकट्या पुष्पनगरी स्मशानभूमीचे सरणाचे २५ लाख रुपये थकले आहेत.
संस्था आणि स्मशानजोगी फ्रंटवर्कर
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत शहरात दोन हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. पालिकेने नेमलेल्या स्वयंसेवी संस्था, स्मशानजोग्यांनी मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. अनेकदा नातेवाईक अंत्यसंस्काराला येत नसत, त्या परिस्थितीत संस्था आणि स्मशानजोगींनी शहरातील ४० स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. मुकुंदवाडी, पुष्पनगरी, सेंट्रल नाका, प्रतापनगर, बेगमपुरा, आंबेडकरनगर आणि कैलासनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याशिवाय पाच दफनभूमीतही अंत्यसंस्कार करण्यात आले.