जालना : मकर संक्राती निमित्त नात्यातील गोडवा अधिक वाढावा, अशीच सर्वसामान्यवर्गाची भावना असते. या सणासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजार फुलून गेला आहे. विशेषत: वाणाचे साहित्य, साड्या, बांगड्या, हळदी-कुंकू, बोळके, तीळ, गुळ, तिळाचा हलवा खरेदीसाठी महिलावर्गाची मोठी गर्दी बाजारात उसळली होती.शहरातील सिंधी बाजार, सराफा बाजार, नुतन वसाहत, चमन परिसरात संक्रांतीनिमित्त विशेष असा बाजार लागला आहे. यात प्रामुख्याने हलवा तसेच वाणाचे साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले आहे. मकर संक्रांती निमित्त एकमेकीच्या घरी जावून वाण देण्याची प्रथा आहे. या भेटीदरम्यान महिला एकमेकींना भेटी स्वरुपात वस्तू देत असतात. त्यात सौंदर्य प्रसाधने, घरगुती उपयोगाच्या वस्तू, पुस्तके, धार्मिक पुस्तके वाणात भेट दिली जातात. या भेट वस्तू सगळ्यांपेक्षा वेगळ्या असाव्यात, असा महिलावर्गाचा उद्देश असतो. त्यासाठी अनेक दुकानेही धुंडाळली जातात. तीळ-गुळ या वस्तूंना मकर संक्रातीस अनन्यसाधारण असे महत्व असते. याला शास्त्रीय कारणेही आहेत. यात तीळ म्हणजे तेल निर्माण करणारा पदार्थ असून हिवाळ्यात तीळ आरोग्यवर्धक असल्याचे सांगितल्या जाते. त्यात गोडवा निर्माण करणाऱ्या अनेक पुरक वस्तूही आता बाजारपेठेत दाखल झालेल्या आहेत. तयार हलवा, रंगीबेरंगी हलवा, तिळाचे लाडू आता तयार स्वरुपात मिळत आहेत. त्यामुळे महिलावर्गाचा ओढा या तयार लाडू अथवा तिळांच्या पदार्थांकडे आहे. सक्रांतीनिमित्त तिळाची आवक जेमतेम असली तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा तिळाचे भाव कमी आहेत. गतवर्षी २०० रुपये प्रतिकिलो असलेले तीळ यावर्षी १४० ते १५० रुपये प्रतिकिलो दराने मिळत असल्याचे व्यापारी बाळू हरबक यांनी सांगितले. त्याचबरोबर गुळ मार्केटमध्येही आवक वाढली आहे. २१०० ते २६०० रुपयांपर्यंत गुळाला भाव असल्याचे व्यापारी गुळ असोसिएशनचे सचिव गोविंदराव सराटे यांनी सांगितले. कपडा बाजारपेठेत महिलांची गर्दी पाहता यावर्षी कपडा बाजारातही मोठी उलाढाल झालेली आहे. विविध प्रकारच्या साड्या, ड्रेस मटेरियल, दागिने आणि सौभाग्याचे अलंकार खरेदीसाठी महिलावर्गाची मोठी गर्दी बाजारात दिसून आली. दरम्यान, संक्रांतीला पतंग उडविण्याची परंपरा आहे. टांगा स्टँड परिसरातील अनेक दुकान विविध आकारातील शेकडो पंतग व त्याच्या साहित्याची विक्री झाली.
मकर संक्रांतीचा बाजार फुलला
By admin | Updated: January 15, 2015 00:06 IST