बीड : महावितरण थकबाकीच्या भोवऱ्यात असतानाच ट्रान्सफर्मरच्या दुरुस्तीे व खराबीमध्ये वाढच होत आहे. गतवर्षापासून बीड मंडळातील दोन हजारांवर ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड झाला आहे. तर अधिकच्या काळाचा वापर झाल्याने ५५० ट्रान्सफार्मर जळून खाक झाले आहेत. त्यामुळ दुरूस्ती आणि नवीन ट्रान्सफार्मरवर महावितरणला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहेत.दरवर्षी रबी हंगामातील पिके पाण्याला आल्यास ट्रान्सफार्मरवर अतिरिक्त भार येत असतो. या काळात शेतीपंप ग्राहक अनधिकृतपणे अतिरिक्त विद्युत पंपाचा वापर करतात. परिणामी ट्रान्सफार्मर अतिरिक्त भार येऊन त्यामध्ये बिघाड होतो.वीजग्राहकांची मानसिकता नसल्याने दिवसेंदिवस थकबाकीत वाढ होत आहे. तर दुसरीकडे नवीन ट्रान्सफार्मर व त्याच्या दुरूस्तीसाठीचा खर्च महावितरणला करावा लागत आहे. परिमंडळातील उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांपेक्षा बीड जिल्ह्यातील ट्रान्सफार्मर जळण्याची खराब होण्याचे अधिक प्रमाण आहे. बीड मंडळातील आष्टी, पाटोदा, गेवराई आदी तालुक्यांत ट्रान्सफर्मर अधिक खराब होतात. यंदाच्या हंगामात ५० केव्ही चे १२, ६३ केव्ही चे १०८०, १०० केव्हीचे ७८२ तर २०० केव्हीच्या ६३ ट्रान्सफर्मरची दुरूस्ती करण्यात आली आहे. सर्वाधिक ६३ केव्हीच्या १०८० ट्रान्सफर्मरची दुरूस्ती करण्यात आली असून प्रत्येकी १८००० रुपयांचा खर्च महावितरण कंपनीला करावा लागला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ६३ केव्हीच्या ट्रान्सफार्मरचा वापर केला जात असल्याने खराबीचे प्रमाणही याच ट्रान्सफार्मरचे अधिक आहे. (प्रतिनिधी)
वर्षाकाठी महावितरणला कोट्यवधीचा चूना
By admin | Updated: January 21, 2015 01:09 IST