सिद्धेश्वर मुंडे , नंदागौळ केंद्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाने देशातील ग्रामपंचायती ‘हायटेक’ बनवून भ्रष्टाचारास आळा घालण्यासाठी पंचायतराज मिशन मोड प्रोजेक्टची सुरुवात एप्रिल २०११ पासून राज्यांच्या मदतीने केली आहे. ग्रामपंचायती हायटेक झाल्या असल्या तरी याचे काम करणार्या तरुणांना मात्र अर्धेच मानधन देऊन हडप करण्याचा संग्राम संबंधित विभागाने मांडल्याचा आरोप संगणक चालकांकडून केला जात आहे. ३० एप्रिल २०११ रोजी सर्वत्र संगणकीय ग्रामीण महाराष्टÑ (संग्राम) हा प्रकल्प हाती घेतला. या परिपत्रकानुसार सुमारे २७ हजार ग्रामपंचायती इंटरनेटद्वारे जोडल्याचे व आॅनलाईन कारभार करण्याचे ठरविण्यात आले. सर्वच ग्रामपंचायतींना संगणक, प्रिंटर या साहित्यासह एक संगणक परिचालक पुरविण्याचे काम ‘महाआॅनलाईन’ या कंपनीला दिले. परिपत्रकानुसार प्रत्येक महिन्याला संगणक चालकाला ८ हजार रुपये मानधन देण्याचे नमूद केले आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ ३ ते ४ हजार रुपये देऊन अर्धी पगार हडपण्याचे काम या महाआॅनलाईन कंपनीने सुरु केल्याचा आरोप संगणक चालक अरुण शिंदेसह इतरांनी केला. महाआॅनलाईनच्या या गलथान कारभारामुळे संगणक परिचालकावर उपासमारीची वेळ आल्याने संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
मानधन हडप करण्यात महाआॅनलाईनने केला ‘संग्राम’
By admin | Updated: May 28, 2014 00:20 IST