औरंगाबाद : गुरुवारी फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा बंद झाल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला. मात्र, हा वीजपुरवठा मनपाच्याच अंतर्गत सदोष आणि कुचकामी यंत्रणेमुळे खंडित झाला होता. यात महावितरणच्या यंत्रणेचा काहीही संबंध नव्हता, असा दावा महावितरणने केला आहे.मनपाकडून पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्यामुळे महिनाभरापासून तीव्र पाणीटंचाई आहे. नागरिकांना चार-चार दिवस पाणी मिळणे कठीण झाले आहे. त्यातच गुरुवारी मनपाच्या फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा आणखीच विपरीत परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर महावितरणचे कार्यकारी अभियंता सुनील काकडे यांनी आज पत्रकारांसह फारोळा येथील केंद्राला भेट दिली. यावेळी जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचारीही उपस्थित होते.गुरुवारी महावितरणकडून वीजपुरवठा खंडित झालेला नव्हता, तर तो मनपाच्याच अंतर्गत यंत्रणेतील बिघाड होता, असा दावा काकडे यांनी केला. मनपाच्या फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राला दोन वेगवेगळ्या लाईनद्वारे वीजपुरवठा करण्यात आलेला आहे. एका बाजूने वीजपुरवठा खंडित झाला, तर पाच मिनिटांत दुसऱ्या बाजूचा वीजपुरवठा सुरू होतो. गुरुवारी हा वीजपुरवठा सुरळीत होता. मात्र, मनपाच्याच अंतर्गत ३३ केव्हीए केंद्रात बिघाड झाला. चारपैकी एक ट्रान्सफॉर्मर बिघडले. हा बिघाड झाल्यावर संरक्षण यंत्रणा कार्यान्वित होणे गरजेचे होते; पण तीही झाली नाही. या ठिकाणी तीन टप्प्यांत संरक्षण यंत्रणा बसविलेली आहे. रोहित्रात बिघाड झाल्यास टप्प्याटप्प्याने या यंत्रणा कार्यान्वित होत असतात. गुरुवारी या तिन्ही टप्प्यांवरील संरक्षण यंत्रणा कार्यान्वित झाली नाही. त्यामुळेच वीजपुरवठा खंडित झाला, असे ते म्हणाले. ढोरकीन येथे स्वतंत्र फिडरवरून वीजपुरवठाढोरकीन येथील पाणीपुरवठा केंद्रासाठी महावितरणने मनपाला कॉमन फिडरवरून वीजपुरवठा केलेला आहे. मात्र, आता तेथेही मनपाला स्वतंत्र फिडरवरून कनेक्शन दिले जाणार आहे. त्यासाठी मनपा १५ लाख रुपये खर्च करीत आहे. हे काम महावितरणच्या नियंत्रणाखाली होणार आहे. त्यासाठी मनपाने महावितरणकडे नुकताच सुपरव्हिजन चार्जेस्पोटी २३ हजार रुपयांचा भरणा केला आहे. जालन्यासाठीही स्वतंत्र लाईनजायकवाडी धरणात औरंगाबाद मनपाच्या उपसा केंद्राशेजारीच जालना नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचे उपसा केंद्र आहे. त्याला मनपाच्या पाणीपुरवठा योजनेच्या लाईनवरूनच जोडणी देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्होल्टेजचा प्रॉब्लेम निर्माण होत आहे. मात्र, आता जालन्याच्या उपसा केंद्रासाठी स्वतंत्र लाईनचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्यांना या लाईनवरून कनेक्शन दिले जाणार आहे.
मनपाची यंत्रणाच आहे कुचकामी
By admin | Updated: June 15, 2014 00:55 IST