राजूर : शेतकऱ्यांचे पीक कर्ज वाटपासह पुनर्गठणाच्या कामात बँकेचे अधिकारी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची अडवणूक करीत असल्याच्या तक्रारीवरून आ. संतोष दानवे यांनी दि.८ रोजी राजूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅक गाठून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आ. दानवेंचा रौद्रावतार पाहून अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली होती. संतप्त शेतकरी व कार्यकर्त्यांनी आ. दानवेंच्या उपस्थितीत बँकेला कुलूप ठोकले.राजूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅकेचे शाखाधिकारी ए.एस. कुलकर्णी हे शेतकऱ्यांचे पुनर्गठण व नवीन वीक कर्ज वाटपात शेतकऱ्यांची जाणीवपुर्वक अडवणुक करीत असल्याच्या तक्रारी मोठया प्रमाणात वाढल्या होत्या. तसेच ग्रामीण बॅक व बँक आॅफ इंडियाच्या शाखेत दलालांचा मोठा शिरकाव वाढल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांची कामे खोळंबली होती. दरम्यान, याबाबत शेतकऱ्यांनी आ. संतोष दानवे यांंच्याकडे तक्रारी केल्या होत्या. यावरून आज आ. दानवे यांनी ग्रामीण बॅक गाठून शाखाधिकाऱ्यांविषयी विचारणा केली असता, ते रजेवर असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सहाय्यक शाखाधिकारी क्षीरसागर यांना शेतकऱ्यांची अडवणूक का करता, असा जाब विचारला. त्यांनी उडवाउडवाीची उत्तरे दिली तर कुलकर्णी यांनी आ. दानवे यांचा भ्रमणध्वनी घेण्यास नकार दिल्याने आ. दानवे संतापले होते. यावेळी आ. दानवे यांनी गेल्या तीन वर्षापासून शेतकरी दुष्काळाचा सामना करीत असून सलग चौथ्या वर्षी दुष्काळाचे सावट पसरलेले आहे. ही गंभीर समस्या लक्षात घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बॅकाना शेतकऱ्यांना विनाविलंब पीक कर्ज वाटपाचे आदेश दिलेले आहे. असे असतांना अधिकारी मुद्दामहून शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचे सांगीतले. आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून शाखाधिकाऱ्याच्या कामचुकार पणाविषयी तक्रार करणार असल्याचे पत्रकारांना सांगीतले. यावेळी जि.प.सदस्य रामेश्वर सोनवणे, सरपंच रवींद्र शेळके, रतन ठोंबरे, भगवान नागवे, जगनराव पवार, राहूल दरक, गजानन नागवे, गणेशराव साबळे, गणेश पुंगळे, सदाशिव नागवे डिगांबर शेजूळ यांच्यासह शेतकरी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
पीककर्जासाठी आमदारांसमक्ष ठोकले बँकेला कुलूप
By admin | Updated: July 9, 2015 00:23 IST