बीड : खरीप हंगामात जिल्ह्यात पाच लाख ५९ हजार ५२९ हेक्टरवर पेरा झाला आहे. मात्र, पावसाने ओढ दिल्याने सबंध पिके धोक्यात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविम्याचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी उपसंचालक बी. एम. गायकवाड यांनी केले आहे. ३१ जुलै ही अंतिम तारीख असल्याने शेतकऱ्यांच्या हाती केवळ एक आठवड्याचा कालावधी राहिलेला आहे.अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी पीकविमा हप्ता रकमेत १० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच गतवर्षी सोयाबीन पीकविम्यापासून वंचित राहिलेले बीड, माजलगाव, गेवराई या तालुक्यांचा यंदा नव्याने सहभाग करण्यात आला आहे. पीक लागवडीप्रमाणे विम्याची अंतिम मुदत ठरविण्यात आली आहे. खरीप ज्वारी, बाजरी, तूर, उडीद, मूग, कारळे, भूईमुग, सोयाबीन, कापूस या पिकांचा विमा सादर करण्याची तारीख लागवडीपासून एक महिना किंवा ३१ जुलै राहणार आहे. तब्बल दीड महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने पिके धोक्यात आहेत. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये पीकविमा काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. गतवर्षी जिल्ह्याला ३३६ कोटी रूपयांचा विमा मिळाला होता. पिकांमधून नाही तर किमान विमा रकमेतून आर्थिक उत्पन्न मिळण्याच्या हेतूने मोठ्या प्रमाणात विमा उतरविण्यात येत आहे.शेतकऱ्यांनी वाढविला रेटपीकविम्याच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी हेक्टरी साडेचार हजार हेक्टरीप्रमाणे पीकविमा काढला जात होता. यंदाच्या वर्षीपासून हेक्टरी सहा हजार प्रमाणे वीमा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही विम्याच्या रकमेत वाढ केली आहे. (प्रतिनिधी)येथील कृषी विभागाच्या वतीने गुरूवारी पीकविमा दिन साजरा करण्यात आला. दरम्यान, शेतकऱ्यांना पीकविम्याचे अर्जवाटप तसेच महत्त्व पटवून सांगण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी तसेच कृषी सहायक उपस्थित होते. गावपातळीवर शेतकऱ्यांना पीकविमा काढण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना विमा काढण्यात अडचण होऊ नये यासाठी कृषी विभागाचे अधिकारी राष्ट्रीयीकृत बँकेत उपस्थित असल्याचेही तंत्र विभाग अधिकारी बनसावडे यांनी सांगितले.
पीकविम्याकरिता उरला शेवटचा आठवडा
By admin | Updated: July 24, 2015 00:47 IST