गोकुळ भवरे । लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : ‘मागेल त्याला शेततळे ’ योजनेला किनवट तालुक्यात यंदा चांगला प्रतिसाद मिळाला असून, शेततळे करण्यात तालुका कृषी कार्यालय किनवटचा जिल्ह्यात तिसरा क्रमांक आला़ तालुक्यातील ३५ गावांत ११६ शेततळे शेतकऱ्यांनी केल्याने या शेततळ्यामुळे २४० टीसीएम पाणी अडणार आहे़शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली़ शेततळ्यामुळे वाहून जाणारे पाणी अडणार आहे़ ११६ शेततळ्यांमुळे २४० टीसीएम पाणी आडणार असल्याने २४० हेक्टर क्षेत्राला पावसाच्या खंडामध्ये संरक्षित सिंचनाची सुविधा येणाऱ्या काळात उपलब्ध होणार आहे़ ‘शासनाने मागेल त्याला शेततळे’ देण्याची योजना सुरू केल्यानंतर शेतकऱ्यांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिला नव्हता. शेततळ्यासाठी ५० हजारांचा निधी पुरेसा नसल्याने शेतकऱ्यांनी पाठ फिरविली, असे असतानाच तालुका कृषी अधिकारी संजय कायेंदे व कृषी सहाय्यकांनी शेततळ्याचे फायदे याविषयी माहिती देऊन शेतकऱ्यांना शेततळे करण्यास परावृत्त केले अन् पावसाच्या खंडामध्ये संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल आणि पिकांना पाणी देणे शक्य होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी शेततळ्याचे कामे केली़एका कृषी सहायकाला २० शेततळ्याचे उद्दिष्ट देण्यात आले. १७० गावांत ७०० शेततळ्याचे उद्दिष्ट असताना ८३० अर्ज प्राप्त झाले़ त्यापैकी ७२९ ना तालुकास्तरीय समितीने मंजुरी देवून कार्यारंभ आदेशही देण्यात आले. सध्या ११ शेततळ्यांची कामे सुरू असून ११६ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली़ त्यापोटी ३० लाख ७५ हजार रुपये वाटप केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संजय कायेंदे यांनी दिली़अंबाडी, कोठारी (सी़), पिंपळगाव, किनवट, पळशी, जवरला, मांडवी, उनकेश्वर, दरसांगवी, उमरी बा़, खंबाळा, बोधडी बु़, पाटोदा खु़, सिंगारवाडी, आमडी, गोकुंदा, मांडवा (कि़), राजगड, सिंदगी (मो़) माळबोरगाव, लोणी, धामनदरी, घोटी, इस्लापूर, कोसमेट, इरेगाव, रिठा, नंदगाव, सावरी, शिवणी, कंचली, गोंडेमहागाव, अप्पारावपेठ, मलकजाम, कुपटी बु़ या ३५ गावांत ११६ शेततळे पूर्ण झाले. येणाऱ्या काही दिवसात ही योजना शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरेल.
किनवट तालुका तिसरा
By admin | Updated: June 27, 2017 00:24 IST